Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांवर त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांवर त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतल्यानंतर विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. या बैठकीला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उपस्थित असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. तसेच शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना देखील वेग आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांचे खंडन केले होते.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, जयंत पाटील आणि आमची कोणतीही संयुक्त बैठक झालेली नाही. जयंत पाटील यांनीही याबाबत खुलासा केला असून, त्या संदर्भातील चर्चा पूर्णपणे चुकीच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
तटकरे यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ही नगरपालिका निवडणुकांसह मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात होती. प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्यांसोबत होणारी भेट ही राजकीयच असते असे नाही. अनेकदा मतदारसंघातील प्रश्न आणि विकासकामांसाठीही भेटी घेतल्या जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना या भेटीची कल्पना नव्हती, अशा चर्चांवरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “ज्या राजकीय बैठका असतात, त्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना असते. आमच्यात उत्तम समन्वय आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात असून राजशिष्टाचाराची मला पूर्ण जाणीव आहे.”
दरम्यान, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिल्याने आता या प्रकरणावर पुढे कोणत्या नव्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
