मुंबई : कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गाव दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 43 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजून 45 लोक बेपत्ता असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावातील विदारक स्थितीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री आज चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही आज कोकण दौरा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत. (CM Uddhav Thackeray to visit Konkan on Sunday)