मनमाड (नाशिक) : मनमाड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ सुरूच आहे. तर तापमान 42 अंशांच्यावर गले होते. त्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे मनमाडमध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे. एकिकडे मनमाडकर गरमीने हैराण झाले असतानाच आता त्यांच्यावर दुसरे संकट आलं आहे. येथे गेल्या काही दिवसा पासून रोज तासंतास वीज पुरवठा खंडित होत आहे. या अघोषित लोड शेंडिंगच्या विरोधात ठाकरे गट शिवसेनेने आंदोलन देखील केले. मात्र त्यानंतर देखील परिस्थिती जैसे थेच राहिली आहे. सायंकाळी आणि रात्री होणाऱ्या लोडशेडींगमुळे शहरात अंधाराचे साम्राज्य पसरू लागले आहे. तर सर्वात जास्त हाल गृहणीचे होत असून अंधारात स्वयंपाक करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे महावितरणने अघोषित भार नियमन बंद करण्याची मागणी केली जात आहे