मुंबई : कोरोनाने (Corona) देशाची चाके थांबवली होती. त्यानंतर दोन एक वर्ष सगळं थांबून होतं. मात्र आता सगळे निर्बंध हटवले गेले आहेत. देशाच्या विकासाची चाके रुळावर धावू लागली आहेत. असे आशा दायक चित्र देशाच्या समोर असताना आता चिंतेचे मळभ देशावर पसरत आहे. देशाच्या विविध भागात पुन्हा कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. महाराष्ट्राच्या (Maharashtra) बाबतीत सांगायचे झाल्यास राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 506 नवीन रुग्ण आढळले आहेत. जी या वर्षी 6 फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक संख्या आहे. शहरातील चाचणी दरम्यान पॉझिटीव्हिटी रेट 6% वर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मुंबईत मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या (corona patients) संख्येत 100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,745 नवीन रुग्ण आढळले आहेत. 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ही 4 कोटी 31 लाख 60 हजारांच्या पुढे गेली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 800 झाली आहे. तेथे गेल्या 24 तासांत 2,236 कोरोना बरे झाले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 600 वर पोहोचला आहे. सध्या, संसर्ग दर हा 0.04% आहे, तर कोरोनाचा पुनर्प्राप्तीचा दर हा 98.74% आहे. त्यामुळे सध्या राज्यात कोरोनाची चौथी लाट येत आहे की फक्त भीती? घातली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
दरम्यान मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोरोनाची संख्या वाढत असताना दिसत जरी असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असा दावा आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. पावसाळ्यात डायरियासारखे आजार होण्याची भीती जास्त असते म्हणून ग्रामीण तसेच झोपडपट्टी भागातल्या लोकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केल्या.