Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा… मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलन सुरू झाले असून, हजारो विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलन सुरू झाले असून, हजारो विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “या मैदानावर आज जमलेली गर्दी एका पक्षाची नाही, तर देशासाठी एकत्र आलेल्या भारतीयांची आहे. आपली ओळख विसरायला भाग पाडणाऱ्यांना आणि भीती दाखवून राज्य करणाऱ्यांना हा जनतेचा आवाज ऐकावा लागेल.”
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जचा उल्लेख करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. “तुमच्या हातात लाठ्या असतील, बंदुका असतील; पण आमच्या हातात तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढण्याची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नाही. या, लाठ्या-बंदुका घेऊन या… मी तिरंगा घेऊन येतो. पाहूया, तिरंगा जिंकतो की हुकूमशाही,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.
दरम्यान, दिल्लीतील NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू असून, मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदोलनातील पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
