मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलं आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक ठिकाणी हे पंचनामे झालेले नाही. आता संप मागे घेण्यात आल्याने कुठे कुठे पंचनामे सुरू झाले आहे. तर या संपामुळेच आनंदाचा शिधा देखिल लोकांपर्यंत पोहचलेला नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा ही एक घोषणा अर्थसंकल्पात शिंदे- फडणवीस सरकारने जाहीर केली होती. पण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तो आनंदाचा शिधा अजूनही कोणापर्यंत पोहोचला नाही असे स्पष्टीकरण सरकारणं दिलं होतं. पण आता हा संप मागे घेण्यात आल्याने जलद गतीने आनंदाचा शिधा वाटायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, असी टीका मिटकरी यांनी केली. मात्र तसे झाले नाही. मोजका अपवाद वगळता आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. या सरकारने वेळ काढू पणा करत हे अधिवेशन चालवलं आहे. शेवटच्या तीन चार दिवसांमध्ये फक्त नवीन बिल मंजूर करणे आणि अंतिम आठवडा प्रस्ताव या पलीकडे सभागृहाचे कामकाज होईल असं वाटत नसल्याचेही ते म्हणाले.