मुंबई : राज्यात शिंदे, फडणवीस सरकार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले होते. आता पुन्हा एकदा गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यात आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दहिहंडीत सहभागी खोळाडू नक्की कोण आहे, त्याचं शिक्षण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतील. तेव्हा एकनाथ शिंदे हे नुकतेच मुख्यमंत्री झाले होते, मात्र या निर्णयाच्या खोलात जावून विचार केल्यास असं लक्षात येईल की हा निर्णय प्रत्यक्षात कृतीत आणण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, असं पवार यांनी म्हटलं आहे.