लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी येथे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदार मतदान करू शकणार आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी सकाळपासूनच मतदान उत्साहात होत असल्याचे पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी मतदार नसल्यामुळे मतदान केंद्रच ओस पडल्याचे पाहायला मिळाले. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यवतमाळ तालुक्यातील हिवरी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या असताना बूथवरील कर्मचाऱ्यांनी मतदान बंद ठेऊन जेवण केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील हिवरी गाव येथील मतदान केंद्रावरील या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.