अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल उघड,आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रीया काय?
अजितदादांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला असताना डीजीसीएच्या AAIB संस्थेचा पहिला रिपोर्ट समोर आला असून त्यात काही प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. त्याबद्दल सरकारच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आज या अपघाताला एक महिना पूर्ण झाला असताना या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अपघाताच्या वेळी विमानातील नेमकी स्थिती काय होती. दृश्यमानता नेमकी किती होती. हा अपघात नेमका कसा झाला, धावपट्टीपासून विमान किती अंतरावर पडले याची सर्व माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. दरम्यान या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर मंत्री आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या ?
अजितदादा यांच्या विमान अपघाताचा एका संस्थेचा हा अहवाल आला आहे. परंतू हा प्राथमिक अहवाल आहे. या अपघाताचा तपास अनेक यंत्रणा समांतरपणे करत आहेत. त्यात सीआयडी, सीबीआय पासून अनेक यंत्रणा गुंतलेल्या आहेत. त्यांचा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन मागणी करणार आहोत असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
हा प्राथमिक अहवाल एका यंत्रणेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या यंत्रणेला या संदर्भात तपासाची जबाबदारी दिली आहे. त्या यंत्रणाचा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी आम्ही मागणी करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. या सर्व यंत्रणांनी केलेल्या तपासानंतर त्यांनी काढलेला निष्कर्ष आणि या सर्वांवर जबाबदार व्यक्तींचा म्हणजे एव्हीएशन तसेच, आंतरराष्ट्रीय संघटनांनी केलेला तपास या सर्वांचा निष्कर्ष काय आहे याची लवकरात लवकर माहीती समोर यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत.
