Maharashtra floods News LIVE : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठे नुकसान
Maharashtra Floods News LIVE Updates in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पुणे निवडणुकीसाठी महापालिकेकडून 23 विशेष कक्ष. आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी 23 विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली असून या कक्षांसाठी संबंधित अधिकारी नेमण्यात आले आहेत. नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कामाला सुरुवात करावी,असे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.अमरावतीच्या बडनेऱ्यात पेट्रोल पंप संचालकाची हत्या. बडनेरा-अंजनगाव बारी मार्गावरील हॉटेल रानमाळ जवळची घटना. मिलिंद मुरलीधर लाड वय 46 राहणार जुनी वस्ती, बडनेरा असे हत्या झालेल्या पेट्रोल पंप संचालकाचे नाव. चौघांनी चाकूने भोसकून लाड यांची हत्या केल्याची माहिती. बडनेरा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील चोराळा येथे शेत रस्त्याच्या वादावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यात 4 जण जखमी झाले असून गावच्या महिला सरपंचना देखील मारहाण झाल्याची माहिती आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे बीडमध्ये दाखल
बीड – बीड तालुक्यातील कुर्ला येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल.
– याच गावाच्या परिसरात एका वस्तीवर पुराच्या पाण्यामुळे अनेक लोक अडकून पडले होते.
– इंडियन आर्मीच्या एका पथकाने एकूण 23 लोकांना बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू केलं होतं.
– शेकडो एकर शेतीचं पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालं आहे.
-
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठे नुकसान
सोलापूर ब्रेकिंग :– सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठे नुकसान– बार्शीतील पांगरी गावामध्ये द्राक्षाची बाग पूर्णतः नापिक झाली– मागील महिनाभरापासून झालेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेची फळधारणा खुंटली– आम्ही द्राक्षासाठी एकरी दोन ते तीन लाख खर्च केला होता त्यातून आम्हाला 6 ते 7 लाख उत्पन्न अपेक्षित होते– मात्र सततच्या पावसामुळे आमची पूर्ण बाग नापीक झाली आ -
-
धाराशिवमध्ये शेतकऱ्यानं जीवन संपवलं, अतिवृष्टीचा पहिला बळी
धाराशिवच्या मात्रेवाडीत अतिवृष्टीचा पहिला बळी
दीड एकर शेती वाहून गेल्याने, शेतकऱ्यानं तणावातून केली आत्महत्या
गळफास घेऊन शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं
डोक्यावर कर्ज, त्यातच अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान यातून आत्महत्या केल्याची माहिती
-
पाथर्डी फाटा परिसरात आणखी एक हत्या, नाशिक हादरलं
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा एका व्यक्तीची हत्या गेल्या 12 तासात दोन हत्येच्या घटनेने नाशिक हादरले दगडाने ठेचून करण्यात आली व्यक्तीची हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट
इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू
भर दिवसा कॅफेत हत्या झाल्याने एकच खळबळ
-
छगन भुजबळांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी
मंत्री छगन भुजबळ येवल्याच्या कोटमगावमध्ये दाखल
भुजबळांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी
आज सकाळपासून भुजबळांकडून आपल्या मतदारसंघात नुकसानाची पाहणी
शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी भुजबळ थेट बांधावर
-
-
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचात मुसळधार पावसाला सुरुवात
एक ते दीड तासांपासून पाऊस सुरूच
मुसळधार पावसामुळे पूर परिस्थितीचा धोका वाढला
विदर्भात आजही जोरदार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा
-
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचात मुसळधार पाऊस
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. एक ते दीड तासापासून जोरदार पाऊस बरसत आहे. सिरोंच्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सिरोंच्यातील आजू बाजूच्या खेड्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नागरिकांना शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. मात्र असाच पाऊस सुरू राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-
पंतप्रधानांनी मराठवाड्यात येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना आवाहन
मराठवाड्यात झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे. पंतप्रधान उत्सव करत आहेत. पंतप्रधानांनी मराठवाड्यात यावं आणि हा दौरा करावा शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावे, असं आवाहन ठाकरेंनी मोदींना केलं आहे. राज्य सरकारला जमत नसेल तर मोदींनी केंद्रातून निधी राज्याला द्यावा, असंही ठाकरेंनी म्हटलं.
-
कर्जमाफी न केल्यास रस्त्यावर उतरु, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
मराठवाड्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे घरासह शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागात पाहणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील पारगावमध्ये भेट दिली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. खचून जाऊ नका. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं. तसेच सत्ताधाऱ्यांनाही इशारा दिला.
कर्जमाफी न केल्यास रस्त्यावर उतरु, अशा कडक शब्दात ठाकरेंनी महायुती सरकारला इशारा दिला. तसेच केंद्राकडून अधिकाअधिक मदत मिळवून द्या, असंही त्यांनी राज्य सरकारला उद्देशून म्हटलं.
-
उद्धव ठाकरे यांच्याकडून धाराशिवमधील पारगाव येथे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून धाराशिवमधील पारगाव येथे पोहचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून धाराशिवमधील पारगाव येथे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला जात आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांची बाजू जाणून घेत आहेत.
-
भाजपाची सांगलीत राष्ट्रवादी विरोधात इशारा सभा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चा विरोधात भाजपाची सांगलीत इशारा सभा होणार आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चाला भाजपा आता प्रतिउत्तर देणार आहे. 1 ऑक्टोंबर रोजी सांगलीमध्ये भाजपाची ही इशारा सभा आणि रावण दहन कार्यक्रम होणार असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटल यांनी जाहीर केले आहे.
-
राजू पाटील यांना हायकोर्टाने मोठा झटका
मनसे माजी आमदार राजू पाटील यांना हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. राजू पाटील यांची कल्याण शीळ रोड आणि पलावा पुलाला अडथळा आणणाऱ्या लक्ष्मी हॉटेलविरोधातील याचिका फेटाळली आहे.
-
सामाजिकरित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे – छगन भुजबळ
आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नाही, जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
-
आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा राज्यात शुभारंभ – रविंद्र चव्हाण
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा राज्यात शुभारंभ झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली “आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान” देशभरात सुरू असून रविंद्र चव्हाण यांनी अभियानाची आज पाहणी केली. पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती (२५ सप्टेंबर) पासून ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती (२५ डिसेंबर) पर्यंत हे अभियान चालणार आहे.
-
गेवराई: ग्रामस्थांचे मोठे नुकसान; घरातील सर्व वस्तू, शेळ्या,कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या
सिंदफना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात धुताडमल या ग्रामस्थाचं घरातील संसार उपयोगी वस्तू आणि शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या आहेत. सिंदफणा नदीच्या पुराचे पाणी मध्यरात्री अचानक घरात घुसले आणि सगळं साहित्य वाहून गेलं आहे. जीव वाचवण्यासाठी चिमुकल्यांना घेऊन या कुटुंब गावाच्या दिशेने धाव घेतली म्हणून त्यांचे प्राण वाचले.
-
बीड: पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचे 5 ते 6 क्विंटल कांदा वाहून गेले
बीड येथील गेवराई तालुक्यातील टाकळगाव येथील शेतकऱ्याचे 5 ते 6 क्विंटल कांदा वाहून गेल्याची घटना घडली आहे. सिंदफना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात गेलं साहित्य वाहून गेलं आहे. गेवराई तालुक्यातील भगवान गव्हाने नामक शेतकऱ्याचे कांदे आणि सौर ऊर्जेचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
-
शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय, मदत करण्यासाठी पंगाच पाहणार आहात का? उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या धाराशिवच्या इटकुरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी सर्व ग्रामस्थांशी, तसेच शेतकऱ्यांशी सवांद साधला. तसेच यावेळी त्यांनी सरकारवर टीकाही केली. “फक्त शेती नाही शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय. योग्य वेळ कधी येणार यासाठी पंचांग पाहणार आहात का? राजकारण करण्यासाठी आम्ही आलो नाही, शेतकऱ्यांवर सरकारकडून अन्याय होऊ देणार नाही” असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांनी हेक्टरी 50 हजारांची मदत सरकारकडून जाहीर करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
-
हेक्टरी 50 हजारांची मदत सरकारकडून जाहीर करून घेऊ : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या धाराशिवच्या इटकुरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी सर्व ग्रामस्थांशी, तसेच शेतकऱ्यांशी सवांद साधला. तसेच हेक्टरी 50 हजारांची मदत सरकारकडून जाहीर करून घेऊ असंही त्यांना शेतकऱ्यांना विश्वास दिला आहे.
-
गेवराई तालुक्यात शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान; पुरामुळे कांदा आणि सौर ऊर्जा उपकरणे गेली वाहून
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंदफना नदीला आलेल्या पुरामुळे टाकळगाव येथील शेतकरी भगवान गव्हाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील अंदाजे ५ ते ६ क्विंटल कांदा पुराच्या पाण्यात वाहून गेला. एवढंच नाही, तर विहिरीवरील मोटारीसाठी आणलेले सौर ऊर्जेचे साहित्य देखील या पुरात वाहून गेल्याने त्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.
-
पाहणी नको, एकरी 1 लाख नुकसानभरपाई द्या, येवल्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल
येवलामध्ये सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गवंडगाव परिसरात मका, सोयाबीन आणि कपाशीची पिके पाण्याखाली गेली असून, तीन दिवसांनंतरही शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गवंडगावात जाऊन मक्याच्या शेताची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. “आम्हाला आता फक्त पाहणी नको, तर थेट मदत द्या,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. “एकरी किमान १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी,” अशी आर्त विनंती शेतकऱ्यांनी भुजबळ यांना केली आहे. या अतिवृष्टीमुळे येवला तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.
-
बीडमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धनंजय मुंडे धावले, थेट बांधावर जाऊन केली पाहणी
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून, रस्ते आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील बोरखेड ते लसमुख ममदापूर या गावांसह अनेक गावांना भेटी दिल्या. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. तेलसमुख येथील शेतकरी तुकाराम कदम आणि त्यांच्या पत्नी रेखा कदम यांनी मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. दिवाळीनंतर त्यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे सर्व शेतीवर अवलंबून होते, पण आता पीक पूर्णपणे वाहून गेल्याने लग्नासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांना सतावत होता. ही परिस्थिती पाहून मुंडे यांनी त्यांना धीर दिला. “तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, प्रशासनाकडून शेतकऱ्यांना पूर्ण मदत केली जाईल, असेही आवाहन त्यांनी केले. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून अन्नधान्य व प्रशासकीय मदतही यावेळी पुरवण्यात आली.
-
जालन्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान: सोयाबीन, कपाशी पाण्याखाली, कुटुंबाला मदतीची गरज
जालना जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची शेती पिकं पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले. बदनापूर तालुक्यातल्या कस्तुरवाडी गावात दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशी यासह इतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. कुटुंबात आम्ही सात सदस्य असून आमची पाच एकर जमीन पाण्याखाली गेल्याने आम्ही करायचं तरी काय? शेती शिवाय उदरनिर्वाहाचं आमचं दुसरं साधन नाही. त्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असं सांगत हा शेतकरी आणि त्याचा मुलगा भावूक झाल्याचं पहायला मिळालं. एकीकडे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे शेती पिकप पाण्याखाली असताना दुसरीकडे बँकेने त्यांना कर्जाची नोटीस पाठवल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा लावली की काय असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे.
-
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाला आहे. बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीत मोठा विसर्ग होत आहे. यामुळे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय.
-
मांजरा नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
वाशी तालुक्यातील पारगाव परिसरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचलंय.
-
उद्धव ठाकरेंनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
“माझं सरकार असताना मी तुम्हाला नुकसानभरपाई दिली होती. आज माझ्या हातात काही नाही. परंतु सरकारकडे मी तुमच्या मागण्या नक्की मांडेन,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं.
-
खचू नका आणि वेडंवाकडं पाऊल उचलू नका- उद्धव ठाकरे
“खचून जाऊ नका आणि वेडंवाकडं पाऊल उचलू नका. तुमच्या मागण्या मी सरकारसमोर मांडेन. आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं.
-
उद्धव ठाकरे लातूरच्या काटगावात दाखल, शेतकऱ्यांशी साधला संवाद
सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर केली. सरकारनं जाहीर केलेली मदत पुरेशी आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केला आहे.
-
छगन भुजबळांकडून येवल्यात नुकसानीची पाहणी
“वर्षभर आता काय करायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. जवळपास सरसकट पंचनामे करावे लागतील. तातडीने ते काम सुरू आहे. ड्रोन किंवा मोबाइलने रेकॉर्ड केलेलं नुकसान ग्राह्य धरलं जाणार आहे. कालपर्यंत सव्वा दोन हजार कोटी रुपयांचं वाटप झालं आहे”, असं भुजबळ म्हणाले.
-
जयंत पाटलांचा माढ्यात पाहणी दौरा
“सकाळपासून जे चित्र दिसतंय ते अत्यंत भयानक आहे. द्राक्षांच्या बागांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजलंय की इथे खूपच नुकसान झालंय. सरकारने या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. ती ताबडतोब आणि सरसकट द्यावी, पंचनामे करण्याच्या भानगडीत पडू नये”, असं जयंत पाटील म्हणाले.
-
पुण्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट
दिवाळीचे दिवे लागणार नाहीत. आमची दिवाळीही होणार नाही अशी परिस्थिती आमची झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी व्यक्त केलीय नऊ एकर शेती आहे ज्वारी आणि सोयाबीन दोन्ही वाहून गेले त्याचा शिक्षणावर परिणाम होणार असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्याने दिली आहे. दोन एकर ज्वारी आहे यातून महिन्याला आठ हजार रुपये मला शिक्षणासाठी पाठवतात तेही यावर्षी मिळणार नसल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.विदर्भातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मदत द्या. कारण आमचे मूळ आर्थिक उत्पन्न शेतीच वाहून गेल्याने हातबल झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्याने दिली आहे
-
पिंजरा लावून बिबट्या आज जेरबंद
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख परिसर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर, हिवरमाथा मळे वस्ती परिसर, पाडळी देशमुख सोसायटीचे व्हाईस चेअरमन विलास रामचंद्र धांडे यांच्या घराभोवती बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या बिबट्याने अनेक जणांचे पाळीव कुत्रे, शेळ्या, छोटी गाई वासरे फस्त केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. यामुळे रात्री अंधार पडल्यानंतर या भागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसाठी बाहेर पडण्यास भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. वडनेर, पिंपळगाव खांब, विहितगाव परिसरात घडलेला प्रकार अतिशय भयावह असल्याने तसा प्रकार आपल्या भागात घडू नये म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी इगतपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आणि स्थानिक वन परिमंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली होती. पाडळी देशमुखचे सामाजिक कार्यकर्ते गोपी धांडे यांच्या सततच्या रेट्यामुळे इगतपुरी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला आज जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात बंद होताच परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
-
मंत्री छगन भुजबळ पाहणी दौऱ्यावर
अवकाळी पावसामुळे येवला तालुक्याती गवंडे गावातील शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं आहे. मंत्री छगन भुजबळ हे पाहणी दौऱ्यावर आहेते. त्यांनी या भागात बांधावर जात नुकसानीची पाहणी केली.
-
सोलापूरात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील शेकडो गावं पाण्याखाली
सोलापूर जिल्ह्यावर अस्मानी संकट कोसळले. उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर गावचे हे विदारक चित्र समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं पुराच्या पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा अशा अनेक तालुक्यांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. शेकडो नागरिकांचा संसार उघड्यावर, तर संपूर्ण घर पुराच्या पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत.
-
सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी
सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड आणि सोनोशी या महसूल मंडळात ढगफुटी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नदी काठावरील शेती खरडून गेलीय . अक्षरशः हात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.त्यामुळे आता दिवाळी कशी साजरी करायची , असा संतप्त सवाल नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केलीय. तर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करायची असेल तर तत्काळ पंचनामा करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, शेतकरी कर्जमुक्त करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
-
पंचनामे सुरु करण्याचे आदेश
अतिवृष्टीने मोठे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसानीतून कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आमच्या आमदारांनी एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. पंचनामे सुरू करण्याचा आदेश दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
-
बुलडाण्याचे पालकमंत्री गायब झाल्याची पोलिसांमध्ये तक्रार
बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह पालकमंत्री संजय सावकारे गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्याला 2 पालकमंत्री असूनही अतिवृष्टीत जिल्हा अनाथ झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
-
नाशिक – छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात
नाशिक – छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात. भुजबळ आज येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. गवंडे गावापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात, अवकाळी पावसामुळे येवल्यातील अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
-
पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या
पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या, 11 व्या मजल्यावरून उडी घेत मनोरुग्णानं संपवलं आयुष्य.
५ सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात रुग्णाला दाखल केलं होतं . विजय असं या मनोरुग्णाचं नाव असून याआधी रेल्वे समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न या मनोरुग्ण रुग्णाने केला होता. याच कारणासाठी रेल्वे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
-
आम्ही स्वार्थासाठी राजकारण करत नाही – संजय शिरसाट
आम्ही स्वार्थासाठी राजकारण करत नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. टीकेची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या हितासाठी सगळं काही करणार असंही शिरसाट म्हणाले.
-
कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला लागली आग, मोठी वाहतूक कोंडी
कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला अचानक आग लागली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
-
पुण्यात मोकाट कुत्र्यांची दहशत, चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला
पुण्यात मोकाट कुत्र्यांची “दहशत” वाढली आहे. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला, सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे.
या हल्ल्यात कुत्र्याने चावा घेत मुलीला फरपटत नेले, चार कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगी जखमी झााली. मात्र त्या ठिकाणी दोन पुरुष वेळीच आल्याने पुढील दुर्घटना टळली.
-
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तरूणीला कारची धडक
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तरूणीला कारची धडक बसली आहे. या अपघाता तरूणी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
नांदेड – विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे कालपासून उघडले, गोदावरी नदीपत्रात 2 लाख 77 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू
विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे कालपासून उघडले असून गोदावरी नदीपत्रात 2 लाख 77 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आगे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून लाखो हेक्टर शेती पिकांना फटका बसू शकतो.
-
नाशिक ग्रामीण व येवला शहर पोलिसांची संयुक्त कारवाई
अमीना नगर परिसरातून एमडी ड्रग, कुत्ता गोली व इतर नशेचा साठा जप्त… लाखोंच्या घरात किंमत असलेला ड्रग्स साठा पोलिसांच्या ताब्यात… चोरीछुपे विक्री होत असल्याने परिसरात खळबळ… संशयित आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
-
चंद्रपूर शहर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू
बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला असून यादरम्यान जोराचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वाढत्या पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची 7 पैकी 5 दारे पाव मीटरने उघडण्यात आली आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आजवर वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 109 टक्के पाऊस पडून गेलाय. अतिवृष्टीने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना पुढील 5 दिवसाचा पावसाचा इशारा धडकी भरवणारा ठरलाय.
-
मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
सरळ सेवेने तांत्रिक व तंत्रिक संवर्गातील पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे… 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली सर्व सेवा तांत्रिक तांत्रिक स्वर्ग पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे…. वैद्यकीय शिक्षण व आयुष्य विभागाने पत्र काढून ही माहिती दिली आहे.
-
अनधिकृत कबुतरखाना सुरुच, हायकोर्टाच्या नियमांचं खुलेआम उल्लंघन
अनधिकृत कबुतरखाना सुरुच आहे. हायकोर्टाच्या नियमांचं खुलेआम उल्लंघन केलं जात आहे. अंधेरी लोखंडवाला परिसरात कबुतरखाना सुरुच…
-
लाडक्या बहिणींना मतासाठी किती पैसे दिले? – विजय वडेट्टीवार
लाडक्या बहिणींना मतासाठी किती पैसे दिले? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत देत नसाल तर तुमची नियत साफ नाही… आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का? असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
-
गोदावरी नदीच्या बॅकवॉटरने ओढ्या नाल्यांना पूर
चक्क ओढ्याच्या पाण्यातून तराफ्यावर झोपून पेशंटला नेले झोपून… नांदेडच्या नायगाव तालुक्यातील परडवाडी गावातील धक्कादायक घटना… ओढ्याच्या पाण्यातून पेशंटचा जीवघेणा प्रवास… कुंटूर ते परतवाडी पुलाची उंची वाढून देण्याची गावकऱ्यांची मागणी…
-
ओढ्याच्या पाण्यातून तराफ्यावर झोपून पेशंटला नेले
गोदावरी नदीच्या बॅकवॉटरने ओढ्या नाल्यांना पूर.चक्क ओढ्याच्या पाण्यातून तराफ्यावर झोपून पेशंटला नेले. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील परडवाडी गावातील धक्कादायक घटना. ओढ्याच्या पाण्यातून पेशंटचा जीवघेणा प्रवास. कुंटूर ते परतवाडी पुलाची उंची वाढवून देण्याची गावकऱ्यांची मागणी.
-
लेह लडाखच्या आंदोलनाला संजय राऊतांचा पाठिंबा
“लेह लडाख भारताच्या सीमेवरचा भाग आहे. तिथल्या जनतेच्या मागणीला देशातील जनतेच समर्थन आहे. आज तिथे जेन झी रस्त्यावर उतरले आहेत. भारताच्या सीमेच्या बाजूला चीन आहे. चीन लडाखमध्ये घुसलेलं आहे, हे विश्वगुरुंना सांगा. सोनम वांगचुक सामाजिक कार्यकर्ता तिथे उपोषण करतोय. त्यांच्याशी कोणी बोलत नाही. असंतोष उफाळून आला तर चुकलं काय?” असं संजय राऊत म्हणाले.
-
खिसे झटकले,तरी 5 ते 10 हजार कोटी सहज पडतील – संजय राऊत
“सरकारने मदत करावी, इतर मदत गुप्त असली पाहिजे. मुंबईतल्या SRA प्रकरणात यांचे खिसे झटकले,तरी 5 ते 10 हजार कोटी सहज पडतील. निवडणुकीवर पैसा खर्च करता आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी पैसा नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
पैशाच सोंग आणता येत नाही, तर सरकार चालवू नका – संजय राऊत
“36 लाख शेतकरी उद्धवस्त झालेआहेत. हे शासन अत्यंत मुर्दाड, असंवेदनशील आहे. पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही. पैशाच सोंग आणता येत नाही, तर सरकार चालवू नका” असं संजय राऊत म्हणाले.
-
सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प
सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी झाला ठप्प. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावाजवळील महामार्गावर पाणीच पाणी. सीना नदीने रौद्ररूप धारण केल्याने जिल्ह्यातील अनेक भागात महापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वाहणाऱ्या सीना नदीला आला महापूर.सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील ही सर्व भीषण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. सीना नदीचे पाणी सर्वत्र पसरल्याने सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद.
-
अमरावती जिल्ह्यात तब्बल 142 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अमरावती जिल्ह्यात तब्बल 142 शेतकऱ्यांच्या आत्महत्या.सर्वाधिक 26 आत्महत्या फक्त ऑगस्ट महिन्यात नोंदवल्या गेल्या.दुष्काळ, पाऊस व आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल.गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात 1249 शेतकरी आत्महत्या प्रकरणे नोंदवली गेली. यंदा 8 महिन्यांतच मागील वर्षांच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण वाढले. शेतमालाला भाव न मिळाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल.जिल्ह्यात सरासरीपेक्षा 112 मिलिमीटर पाऊस कमी.
-
अमरावती जिल्ह्याला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई मदत
अमरावती जिल्ह्याला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई मदत मिळणार. राज्य सरकारकडून मदत जाहीर. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका.अमरावती जिल्ह्यात 1 लाख 23 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान. 1 लाख 68 हजार शेतकऱ्यांना फटका.7 ते 8 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती.
Published On - Sep 25,2025 8:16 AM
