Maharashtra News LIVE : LPG गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार करण्यांवर कारवाई होणार
Maharashtra News LIVE Updates : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतात तीव्रतेने जाणवू लागले आहेत. घरगुती गॅसचं मुख्य संकट निर्माण झालं आहे. युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
23 मार्च रोजी होणाऱ्या विशेष महासभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार
ठाणे परिवहन सेवेचा अर्थसंकल्प या दिवशी सादर केला जाणार आहे..स्थायी समिती अद्याप स्थापन न झाल्याने 2026 -27 चा अर्थसंकल्प आता थेट महासभेला सादर केला जाणार आहे. ठाणेकरांना नव्या कोणत्या सुविधा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा कोणत्याही स्वरूपाची करवाढ अथवा दरवाढ नसल्या अर्थसंकल्प असणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली..
-
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरू
तब्बल २० वर्षांनंतर प्रत्यक्ष निवडणुकीतून संघाला नवा अध्यक्ष आणि २२ कार्यकारिणी सदस्य मिळणार. अध्यक्षपदासाठी डॉ. गिरीश गांधी, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. रंजन दारव्हेकर, डॉ. श्रीपाद जोशी आणि प्रदीप दाते हे पाच उमेदवार रिंगणात. कार्यकारिणीच्या २२ जागांसाठी ८३ उमेदवारांमध्ये चुरस.७ हजार ४९३ मतदारांना पाठवलेल्या मतपत्रिकांपैकी ४ हजार ९३५ मतपत्रिका संघाकडे प्राप्त.
-
-
धाराशिवमध्ये गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आक्रमक; साठेबाजांवर धाडी टाकण्याचे आदेश
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि येरमाळा येथील आगामी यात्रांच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा भासू नये आणि काळाबाजार रोखला जावा, यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः यात्रा कालावधीत व्यापाऱ्यांना लागणाऱ्या गॅस मागणीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच घरगुती गॅसच्या शिल्लक साठ्याचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. जर कुठेही गॅसची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास तात्काळ धाडी टाकून साठा जप्त करण्याच्या सूचना पोलिसांनी देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना गॅस सुलभतेने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
-
नाशिक शहरात १५ मार्चपासून शस्त्र आणि जमावबंदी लागू; पोलिसांचा कडक इशारा
नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते २९ मार्चपर्यंत शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. या काळात शहरात कोणत्याही प्रकारची सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी लग्नकार्य, धार्मिक मिरवणुका, तालुक्याचे आठवडे बाजार किंवा अंत्ययात्रा यांच्यासाठी जमणाऱ्या जमावास या आदेशातून सवलत देण्यात आली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा गटावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
-
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला असून, जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागांत १७ ते २० मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कडक उन्हाचा कडाका जाणवत असला तरी, उद्यापासून तापमानात मोठी घट होऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. रब्बी हंगामातील गहू आणि इतर पिके सध्या काढणीला आली असतानाच, या नैसर्गिक संकटामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य सुरक्षित जागी साठवणूक करावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
-
-
KDMC मध्ये भाजपची फिल्डिंग; स्थायी समिती सभापती पदासाठी शड्डू ठोकला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची महासभा जवळ येत असतानाच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून भाजपने स्थायी समिती सभापती पदावर आपला ठाम दावा ठोकला आहे. महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची पालिकेत एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये सर्व नगरसेवकांनी ‘वज्रमूठ’ आवळत सभापती पद भाजपलाच मिळावे, अशी एकमुखी मागणी केली आहे. सध्या केडीएमसीमध्ये महापौरपद शिवसेना (शिंदे गट) कडे असून उपमहापौरपद भाजपकडे आहे; मात्र आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
गणिताचे उत्तर चुकले म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण; नागपुरातील संतापजनक प्रकार
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवळी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १० मार्च २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीनंतर संबंधित शिक्षकाने पालकांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी चाईल्ड हेल्पलाईनच्या चमूने तातडीने दखल घेत पीडित मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली. ज्यानंतर दोषी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.
-
-
४ वर्षांनंतर नागपूर मनपाची पहिली महासभा; नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता
नागपूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण महासभा २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून, चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर ही सभा वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत. या काळात नागरिकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नव्हते, परंतु आता नगरसेवकांच्या माध्यमातून शहरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न थेट सभागृहात गाजणार आहेत. विशेषतः उन्हाळ्यातील पाणीटंचाई, सदोष पाणी बिले, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि शहरातील ग्रीन जिमची झालेली दुरवस्था या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
-
मिरा रोडमध्ये मनसेचा खळ्ळ् खट्याक; हॉटेलच्या गुजराती पाटीला फासले काळे
मिरा रोड येथील एक्सप्रेस हायवेवर असलेल्या ‘अमर पॅलेस’ या उपहारगृहाने मराठी भाषेला डावलून केवळ गुजराती भाषेत नामफलक लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब निदर्शनास येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तातडीने हॉटेल गाठले आणि मराठी भाषेचा अवमान केल्याबद्दल संताप व्यक्त करत गुजराती भाषेतील पाटीला काळे फासले. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा सन्मान राखलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मांडली.
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीत अडथळे आल्याने एलपीजी गॅसच्या आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री (काळाबाजार) होण्याचे प्रकार समोर येत आहेत. सध्या वितरकांकडून होणारा विलंब आणि टंचाईच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. एलपीजीच्या कमतरतेमुळे जी स्थिती निर्माण झालीय, त्याचे सर्व अपडेट्स आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Published On - Mar 15,2026 8:59 AM
