Maharashtra News LIVE Updates : अहिल्यानगर : देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला अटक
Maharashtra News LIVE Updates: . अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. भिवंडी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढविणाऱ्या भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली आहे. अशात महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. अपघात टाळण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. सात जणांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील आणि सुखकर प्रवास कसा करता येईल याचा समिती अभ्यास करणार. भिवंडी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढविणाऱ्या भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली आहे. भाजपा पाठोपाठ शिवसेना सुद्धा महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार आहे. अशी घोषणा पक्षनेते प्रकाश पाटील यांनी केली आाहे. उन्हाळ्याची सुद्धा चाहून लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात खडकी- हिसार,दौंड – अजमेर सोलापूर – अजमेर या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे… राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा…
LIVE NEWS & UPDATES
-
भंडारा : धान खरेदी केंद्रांची लिमिट संपली, भंडाऱ्यातील शेतकरी अडचणीत
भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांची खरेदी मर्यादा पूर्ण झाल्याने सुमारे 70 टक्के धान उत्पादक शेतकरी विक्रीपासून वंचित राहिल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी धान साठून राहिले असून आर्थिक अडचणी वाढत आहेत. तातडीने मोजमाप करून धान खरेदी सुरू करावी आणि केंद्रांची लिमिट वाढवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-
अहिल्यानगर : देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला अटक
नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरात सापळा रचत पोलिसांनी आरोपी संतोष नरोटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि साडेचार लाख रुपयांची मालवाहू गाडी असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
-
-
पुणे : आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथील ग्रामस्थांकडून आमरण उपोषणाचा इशारा
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावात सौर ऊर्जा प्रकल्पावरून वादंग निर्माण झाला आहे. आवादा कंपनीकडून ग्रामपंचायतीची केवळ दोन हेक्टर जमिनीची परवानगी घेण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांचा आहे. मात्र प्रत्यक्षात तब्बल बारा हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन ही गावाची गायरान जमीन असून ती गावाच्या सामायिक वापरासाठी राखीव आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सौर पॅनल बसवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अनधिकृत काम थांबवावे, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
-
अहिल्यानगर : संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यांवर नगरपालिकेचा बुलडोझर
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांविरोधात आज नगरपालिका प्रशासनाने मोठी आणि ठोस कारवाई केली आहे. वारंवार कारवाई होऊनही सुरू असलेले अवैध कत्तलखाने अखेर पालिकेकडून भुईसपाट करण्यात आले. या कारवाई दरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-
उसाने भरलेला ट्रॅक्टर नदीपात्रात कोसळून दुर्घटना
साक्री तालुक्यातील कासारे येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर नदीपात्रात पडल्याने दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टर शेजारी बसलेला व्यक्तीचा जागीच मृत्यू तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
-
महापालिका आवारात शासकीय वाहनात चालकाचे बिअर सेवन
ठाणे महापालिकेच्या मुख्यालय परिसरात दुपारी घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वाहनामध्ये अक्षरशः वाहन चालक मद्यप्राशन करतानाचा व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार आयुक्त व महापौर यांच्या अधिकृत वाहनांच्या पार्किंग परिसरात घडला आहे.
-
धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात ‘दूषित’ पाणीपुरवठा
जळगाव जिल्ह्यातील १३ गावांत ‘दूषित’ पाणीपुरवठा होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल , जळगाव आणि पारोळा या तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित 13 गावांना नोटीस बजावली असून पुढील महिन्यात परिस्थिती न सुधारल्यास थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
-
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून राजपाल यादवला मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाने 18 मार्च पर्यंत राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तक्रार दाराच्या खात्यात दीड कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते असा युक्तीवाद राजपाल यादव यांच्या वकीलाने केला आहे.
-
सोलापूर शहरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 3 तरुणांचा जागीच मृत्यू
सोलापूर शहरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात तीन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. आज पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या अपघातात शहरातील 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील तिघांपैकी एक तरुण गोसेवक असल्याने हा अपघात की घातपात याबाबत तरकवितर्क सुरु आहेत. नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी अशी मृत तरुणांची नावं आहेत.
-
योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल- एकनाथ शिंदे
जसा मी दानशूर आहे, तसा मी धाडसीसुद्धा आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल. राज्यात सर्वसामान्यांचं सरकार गरजेचं होतं. सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. शेतकरी चळवळ काय आहे, हे धोंडगेंना माहीत आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
गणेश नाईकांना जी काही माहिती हवी, ती शिंदेंनी द्यावी- भाजप आमदार संजय केळकर
“गणेश नाईकांच्या प्रश्नांची उत्तरं का दिली जात नाहीत? एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं तरी पुरेसं आहे. चौकशी लावणार की काय करणार, जे उत्तर असेल ते द्या. गणेश नाईकांना जी काही माहिती हवी, ती शिंदेंनी द्यावी,” अशी मागणी ठाण्यातून भाजप आमदार संजय केळकर यांनी केली.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत.
-
नांदेडचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत प्रवेश
नांदेडचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं राहणं कर्तव्य असल्याचं एकनाश शिंदे म्हणाले. शिवसेना म्हणजेच कार्यकर्त्यांचा पक्ष. शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभा राहतो, कारण मी स्वत: कार्यकर्ता आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा सोपा केला. पक्षात जो काम करेल, तो पुढे जाईल, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
-
करमाळ्यात शेतीला वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी आक्रमक
करमाळा तालुक्यातील रावगाव इथं शेतीला वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. करमाळा इथल्या महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत आत्मदहन आंदोलन रोखलं. आत्मदहन आंदोलनाचा निवेदन देऊन देखील महावितरण अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले.
-
पराभवातून खचून जाऊ नका, कामाला लागा; राज ठाकरेंचं उमेदवारांना आवाहन
“काल राज ठाकरेंनी प्रामुख्याने पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली. पराभवातून खचून जाऊ नका, कामाला लागा, पुन्हा आठ दिवसांनी पुण्यात येतोय, येताना पुण्यासाठी आराखडा घेऊन येतो, असं ते उमेदवारांना म्हणाले. निवडणूक लढताना काय त्रुटी राहिल्या याबाबत राज ठाकरे बोलले. युतीमध्ये पहिली निवडणूक असल्यामुळे आम्ही कमी पडलोय. भारतीय जनता पार्टी दुबार मतदार आणि बोगस मतदार यांच्यामुळे सत्तेत आली आहे,” अशी प्रतिक्रिया मनसे नेते हेमंत संबूस यांनी दिली.
-
पुण्यातील भाजपा आणि काँग्रेस राडा प्रकरणाची संपूर्ण माहिती रवींद्र चव्हाण यांना देणार
पुण्यातील भाजपा आणि काँग्रेस राडा प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष धीरज घाटे कालच्या घटनेची संपूर्ण माहिती प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देणार आहेत. भारतीय जनता पार्टी आणि काँगेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल केल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नसल्याचं धीरज घाटे यांनी सांगितलं आहे.
-
ठाणे मनपात सत्ता स्थापन होताच भाजपाची मोठी मागणी
ठाणे मनपात सत्ता स्थापन होताच भाजपाने मोठी मागणी केली . MMRDA च्या धर्तीवर ठाण्याच्या विकासा करता ठाणे शहर विकास समिती म्हणजेच TMRDA ची स्थापना करण्याची मागणी भाजपाचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली. त्यांनी पत्राद्वारे केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे. ठाण्यावर अंकुश मिळवण्यासाठी भाजपाची मोठी खेळी.
-
परभणी महापालिका नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांनी स्वीकारला पदभार
परभणी महापालिकेचा महापौर आणि उपमहापौर पदाचा पदभार समारंभ संपन्न झाला. नवनिर्वाचित महापौर उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला .
महापौरपदी उबाठाचे सय्यद ईकबाल विराजमान झाले तर काँग्रेसच्या गणेश देशमुखांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला . शिवसेना उबाठाकडून प्रथम महापौर बनण्याचा सय्यद इकबाल यांना मान देण्यात आला .
-
धाराशिव जिल्ह्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग
धाराशिव जिल्ह्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. परंडासह उमरगा येथील दोन अपक्ष जिल्हा परिषद सदस्य भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या गोटात . सहलीवर गेलेला भाजप उमेदवारांचा कोकणातील मुक्काम कर्नाटकात हलवला आहे. सहलीवर गेलेल्या भाजप उमेदवारासोबत तीनही अपक्ष उमेदवार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
-
पुणे – शरद पवार आज पुन्हा जाणार रुग्णालयात
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार आज पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात जाणार आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, मात्र ते तपासणीसाठी रुग्णालयात जाणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्णपणे उपचार घेतल्यानंतर शरद पवारांची आज पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे.
-
भाजीपाला स्वस्त, टोमॅटोसह पालेभाज्यांचे दरात घसरण, ग्राहक खूश, शेतकरी चिंतेत
वाशिम बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ३० रुपयांपर्यंत मिळणारे टोमॅटो आता १० ते २० रुपये किलोने मिळत आहे. तर पालकाची जुडी १० रुपयांना मिळत आहे. तसेच कोबी, बटाटा, वांगी आणि भेंडीचे दरही निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव अत्यंत कमी असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
-
सोलापुरात जमिनीच्या वादातून सख्या भावाचा खून, 68 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
सोलापूरच्या माढा तालुक्यातील जाखले गावात शेतीच्या बांधावरून झालेल्या वादाचे रुपांतर एका भीषण हत्येत झाले आहे. धाकटा भाऊ उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड याने आपला मोठा भाऊ हनुमंत रघुनाथ गायकवाड (६८) यांच्यावर लोखंडी घणाने प्रहार करत त्यांची निर्घृण हत्या केली. जमिनीच्या बांधावरून दोघांमध्ये जुना वाद होता. ज्यातून धाकट्या भावाने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी उत्तरेश्वर गायकवाड याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेची मुंबईत बैठक; महापालिका आणि जिल्हा परिषदेबाबत होणार निर्णय
छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. महापालिकेतील गटनेतेपद कोणाला मिळणार आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्तेचे समीकरण कसे जुळणार, यावर या बैठकीत चर्चा होईल. तसेच, महापालिका निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेऊन संघटनेत फेरबदल केले जाण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
-
मुंबईच्या जे जे रुग्णालयातील डॉक्टर आजपासून उपोषणावर
मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २०० निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत. यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सेवांचा अभाव, वेळेवर पगार न मिळणे आणि रुग्णालयातील अपुरी सुरक्षा व्यवस्था अशा गंभीर समस्या डॉक्टरांना भेडसावत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने अखेर डॉक्टरांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
-
मुंबई महापालिकेला आज मिळणार नवा विरोधी पक्षनेता, पण कार्यालयाची स्थिती अद्याप जैसे थे
मुंबई महानगरपालिकेत आज विरोधी पक्षनेत्याची अधिकृत घोषणा होणार असून, नवनियुक्त नेते आजच आपला पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर या पदासाठीचे कार्यालय अद्याप पूर्णपणे तयार नसल्याचे समोर आले आहे. कार्यालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने तिथे अद्याप रंगाचा उग्र वास येत आहे, तसेच नेत्यांच्या दालनासमोर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आसनव्यवस्थेचे कामही अपूर्ण आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय मात्र वापरण्यायोग्य स्थितीत नसल्याने कामाच्या सुरुवातीलाच काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
-
बुलढाण्यात दोन दिवसांत दोन वर्गमित्रांची आत्महत्या; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
बुलढाणा शहरातील भारत विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या दोन जिवलग मित्रांनी अवघ्या 48 तासांच्या अंतराने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी नमन अरुण राऊत याने, तर १२ फेब्रुवारी रोजी अथर्व वैभव राणे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यातील एकाचे वडील कारागृह पोलीस आहेत, तर दुसऱ्याचे आई-वडील शिक्षक आहेत. एकाच वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी लागोपाठ टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक क्षेत्रात आणि पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या दोन्ही आत्महत्यांमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांसमोर या गूढ घटनांचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
-
जळगावात कारच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू
जळगावच्या चोपडा-विरवाडा रस्त्यावर कारच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू. तीन जण गंभीर जखमी. राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत अशी अपघातात मयत झालेल्या दोन्ही तरुणांची नावं आहेत. बंटी रविंद्र कोळी, राकेश भगवान राजपूत व विजय अमृत भोई हे तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरवाडे गावातील 5 तरुण कारने एका कार्यक्रमाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती.
-
भिंगार वारुळवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन
अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या भिंगार वारुळवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन. बिबट्या मानवी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये घाबरट. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल. मात्र बिबट्या एका जागेवर थांबत नसल्याने मोठी धावपळ उडाली आहे.
-
व्यावसायिकाने स्वतःच्या संरक्षणासाठी लेडी बाउन्सर्स नेमल्या
बीडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हाणामारीच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. बीड तहसील परिसरात संपत्ती खरेदी विक्रीतून एका बांधकाम व्यावसायिकाला तीन महिलांनी मारहाण केली होती. या सर्व घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान आता याच महिलांकडून पुन्हा हल्ला होऊ नये याची खबरदारी म्हणून बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या संरक्षणासाठी लेडी बाउन्सर्स नेमल्या आहेत.
-
माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. बेकायदेशीरपणे शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी सुनावणी. बनावट कागदपत्रे सादर केल्याचा कोकाटे यांच्यावर आरोप. सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ठरविले होते दोषी. न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत शिक्षेवर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात मिळवला होता अंतरीम जामीन. जामीनाची मुदत संपत असल्याने पुन्हा जामीन मिळावा यासाठी कोकाटे यांच्याकडून अर्ज. आज या अर्जावर केली जाणार सुनावणी.
-
आपत्तीग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी
आपत्तीग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी.. उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाचा निर्णय.. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील अकृषी विद्यापीठांसह, सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होणार..
-
शिष्यवृत्ती परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ.. 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार..
-
राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता
राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता.. महावितरण कंपनीकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर.. यासंदर्भात नागपूरमध्ये जनसुनावणी..
-
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ.. खडकी- हिसार, दौंड – अजमेर आणि सोलापूर – अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश.. रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार..
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामाला विरोध
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामाला विरोध.. विद्यापीठातील 23 अनुदानित विभागातील 82 प्राध्यापकांना जनगणनेचे काम देण्यात आल्याची माहिती.. मनुष्यबळ कमी असल्याने काम न देण्याची मागणी..
-
उन्हाळ्याची चाहूल; तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ग्रीन नेटची सुविधा
हिवाळा ओसरत असताना वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातील प्रवेश मार्ग आणि रांगेच्या ठिकाणी ग्रीन नेट बसविण्यात आले आहे. या सुविधेमुळे थेट सूर्यकिरणांचा प्रभाव कमी होऊन भाविकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थानने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
-
पुण्यात राज ठाकरेंनी घेतली प्रमुख पदाधिकारी आणि पराभूत उमेदवाराची बैठक
राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना झापले आहे. पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज आहेत. सांगितलेल्या गोष्टी न केल्याने राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. या पुढे दर आठवड्याला राज ठाकरे स्वत: पुणे मनसेचा आढावा घेणार. तसेच पराभवातून बाहेर पडत कामाला लागण्याच्या देखील सूचना दिल्या. येणाऱ्या काळात काम करत रहा कुठे ही कमी पडू नका… पुण्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचा… अशा ही सूचना राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत दिल्या आहेत.
-
भटाळा दर्शनावरून परत येताना शिवभक्तांचा वाहन पलटी, एक ठार, १७ प्रवासी जखमी
शिवभक्तांचा दर्शनावरून परत येताना वाहन पलटी झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर १७ प्रवासी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा जवळील घडली. १२ जण गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. पाटाळा परिसरातील शिवभक्त मालवाहक वाहनातून भटाळा येथे त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना हे सर्वजण पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते पलटी झाले.
-
शिष्यवृत्ती परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
-
अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात
अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात सापडले आहेत. दोन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने आदिवासी मजुरांमध्ये संताप वाढला. अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी रखडली. मेळघाटातच 22 कोटी 28 लाख रुपये थकीत.चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर सर्वाधिक प्रभावित आहेत. होळी सण जवळ, पण मजुरांच्या हातात पैसे नाहीत. प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.
-
जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारांचा सन्मान
जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारांचा सन्मान करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत निवडणूक आल्यानंतर जिल्हाप्रमुख चरणराज चवरेंचा सत्कार केला आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी चरणराज चवरे यांच्यावर पालखी महामार्गात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता, मात्र या आरोपांनंतरही जिल्हाप्रमुख चरणराज चवरे हे निवडून आलेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्याचा कानमंत्र दिला.
Published On - Feb 16,2026 8:20 AM
