Gulabrao Patil : संजय राऊत, पांढऱ्या पायाचा माणूस, शिवसेना फुटीनंतर गुलाबराव पाटील यांची अत्यंत बोचरी टीका
Gulbrao Patil on Sanjay Raut: ऑपरेशन टायगरने अखेर उद्धव सेनेला मोठे खिंडार पाडले. 6 फुटीर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्याला लोकसभा अध्यक्षांनी मंजूरी सुद्धा दिली. शिवसेना फुटीनंतर गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Gulbrao Patil on Sanjay Raut: ऑपरेशन टायगर एकदाचे फत्ते झाले. उद्धव सेनेचे 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिल्याचे ही समोर आले आहे. आता हा फुटीर खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन होण्याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
राऊत पांढऱ्या पायाचे
खासदार संजय राऊत यांनी पक्षाची सूत्र हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे सेनेची अधोगती झाली आहे. खासदार फुटीच्या चर्चांवर गुलाबराव पाटील यांनी अशी खोचक टीका केली आहे. तर संजय राऊत हे पांढऱ्या पायाचा माणूस आहे. त्यामुळे या माणसाचा पांढरा पाय काळा कसा होईल हे पाहायला पाहिजे अशी बोचरी टीका पाटलांनी या पक्ष फुटीवर केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा संताप अनावर झाला. त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांना शिवी हासडली. त्यांनी पहिल्या पक्षफुटीनंतर शिवसेना स्वतंत्र चिन्हावर लढली होती, याचा उल्लेख केला. तर आता जनता या फुटीर खासदारांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
मंत्री उदय सामंत यांचा टोला
दिल्लीत झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खासदारांच्या बैठकीत , 3 खासदार उपस्थित होते. सहा कुठे गेले हे मलाही कळत नाही, असा मिश्किल टोला मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सेनेला लगावला. ठाकरेंचे खासदार शिवसेनेत येणार आहे. तर स्थानिक पदाधिकारी नाराज आहे यावर उदय सामंत यांनी निर्णय होऊ द्या, त्यानंतर बोल ना योग्य राहील असं सूचक व्यक्तव्य केले.
शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावेत अशी आमची इच्छा आहे . भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही त्यांचे नेते उच्च पदावर असवेत असं वाटत असते, मात्र अंबादास दानवे हे देखील एकनाथ शिंदे यांनी उच्च पदावर बसावं असं म्हणत असतील तर यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे मला कळत नाही असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.
ही तर अरेरावीच
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी ऑपरेशन टायगरवर मोठे भाष्य केले आहे. ही एक प्रकारची अरेरावी या देशांमध्ये राबवली जात आहे. टीएमसीला तोडायचं, एनसीपीला तोडायचं, शिवसेनेला तोडायचं हे असं सुरू आहे, असे त्या म्हणाल्या. ज्या गोष्टी होत आहे त्या असवैधानिक पद्धतीने होत आहे या सगळ्याच उत्तर जनता देणार आहे. वायफळ पैसे त्यांच्याकडे आहे, पैशातून सत्ता सत्तेतून पैसा सुरू आहे. आमची काँग्रेसच्या गटनेत्या सोबत बैठक झाली आहे नगरसेवकांना बैठक झाली आहे आमचे नेते निर्णय कळवतील, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले.
