Sanjay Raut: सरकारला मनोज जरांगे यांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, केला तो मोठा आरोप
Sanjay Raut on Manoj Jarange : उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठा खळबळजनक दावा केला. त्यांनी मनोज जरांगे यांना मारायचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. तर शरद पवार राष्ट्रवादी विलिनीकरणावरही मोठे भाष्य केले.

ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक दावा केला. सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचं असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. आता जरांगे पाटील यांचा उपयोग सरकारच्या दृष्टीने संपल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाविषयी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही त्यांनी भाष्य केले. त्यांच्या या नवीन दाव्यामुळे राज्यात राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.
मनोज जरांगे पाटील यांना मारायचंय
“सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचंय. त्यांची लढाई, संघर्ष हा त्यांच्या गळ्याचा फास बनला आहे. जरांगे पाटील यांचा उपयोग सरकारच्या दृष्टीने संपला आहे. त्यांच्या लढ्याचा, उपोषणाचा सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी, निवडणुकीसाठी उपयोग करून घेतला. आता जरांगे पाटील यांना वाऱ्यावर सोडले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा, बारावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याचं मी पाहिलं. हे अत्यंत अमानुष आहे”, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
धनुष्यबाण चिन्हाविषयी मोठं वक्तव्य
मुळात धनुष्यबाण हे जे चिन्हं आहे, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. त्यांच्यामध्ये शिंदे, मिंधे आणि अमित शाह यांचा काहीएक संबंध नाही. ठाकरे यांच्या शिवसेनेचे परंपरागत चिन्ह हे धनुष्यबाण आहे. या लोकांनी ते कारस्थान करून चोरलं. चोरीचे नेतृत्व अमित शाह यांनी केले. चोरीची तक्रार दाखल करतो, त्यावेळी मुद्देमाल जप्त करतात ना. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, मुद्देमाल जप्त करा, धनुष्यबाण गोठवा. चोरांच्या हातात धनुष्यबाण असणं हे अत्यंत अप्रतिष्ठेचं आहे. सुनावणी अंतिम टप्प्यात आहेत आणि शिंदे यांचे वकील वेळकाढूपणा करत आहेत. सुनावणीच्या काळात सलग सात ते आठ दिवस रोज दोन वाजता आमचा युक्तीवाद सुरू व्हायचा. जर त्यांची बाजू खरोखर सत्याची असेल तर रोज युक्तीवाद करून त्यांनी त्यांनी सुनावणी संपवायला हवी. धनुष्यबाणाचा निकाल हा तात्काळ लागयला हवा. या चोरलेल्या धनुष्यबाणाचा फायदा निवडणुकीत त्यांना झाला आहे. धनुष्यबाण घराघरात पोहचण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं आहे. ते त्यांना चोरून आयतं मिळालं, ते गोठवलं गेलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे भाजपसोबत कधीच जाणार नाही
पक्षांतर बंदी कायदा प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकरांनी पक्षांतर बंदीवर बोलू नये, तो अपमान ठरेल असे राऊत म्हणाले. राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य असल्याचे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले. त्यावर बोलताना, रोहित पवार हे योग्य बोलत आहेत. अजितदादांचा पक्ष हा भाजपसोबत सत्तेत आहे. आज भाजपने देशात आणि राज्यात जी भूमिका घेतली ती हिताची नाही. अजितदादांची एक मजबूरी होती. त्यामुळे ते भाजपसोबत गेले. मूळ पक्ष हा शरद पवार यांच्याच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि निर्मिती ही पवार यांचीच आहे. आमदार निघून गेले. विलिनीकरणाबाबत बोलत तेव्हा ते एकतर्फी होत नाही. माझी पूर्ण खात्री आहे की शरद पवार हे भाजपसोबत कधीच जाणार नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
