Sanjay Raut: वाईट घडायचं असेल की ‘शाह’ कनेक्शन आलंच… NEET पेपरफुटीप्रकरणात संजय राऊतांचा भाजपवर तो गंभीर आरोप, एकच खळबळ
Sanjay Raut on NEET Exam Paper Leak: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका पेपरफुटीप्रकरणात उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठा आरोप केला. त्यांनी भाजपवर तोफ डागली. त्यांच्या नवीन आरोपाने खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut on NEET Exam Paper Leak: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका पेपरफुटीप्रकरणात उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर गंभीर आरोप केला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. या पेपरफुटीचे कनेक्शन राज्यात असतानाही मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नसल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल चढवला. तर या पेपरफुटीमागे भारतीय जनता पक्षच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या नवीन आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
देशाची अर्थव्यवस्था गंभीर स्थिती
भारतीय जनतेवर किमान चारवेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जात असल्याची माहिती आहे. भारतीय जनतेने प्रवास करायचा नाही, घराबाहेर पडायचं नाही. इंधन बचत करायची असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. राज्यातील सरकार जनतेची फसवणूक करत आहे. जनतेशी खोटं बोलत आहे. जनतेशी प्रामाणिक नाही. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. या देशात आर्थिक तुफान येणार आहे हे राहुल गांधी जे म्हणत आहेत ते खरं आहे. सर्व उद्धवस्त होणार आहे. त्याची चिंता या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना नाही. ते सध्या हवेत आहेत, जमिनीवर नाहीत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
काही वाईट घडायचं असेल की ‘शाह’ कनेक्शन
नीट पेपर फुटीचं केंद्र हे मराष्ट्रातच आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. नीट पेपरफुटीचं केंद्र जर महाराष्ट्रात असेल तर त्याचा केंद्रबिंदु लातूरपासून पुण्यापर्यंत पसरलेला असेल. तर त्याची जबाबदारी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आहे. त्याचा मास्टरमाईंड चेतन शाह याला काल CBI ने अटक केली. म्हणजे काही वाईट घडायचं असेल की शाह कनेक्शन कुठं तरी असतंच महाराष्ट्रात. या पेपरफुटीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का हा माझा प्रश्न आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य तुम्ही उद्धवस्त करत आहात आणि त्याचा केंद्र बिंदू महाराष्ट्रात आहे, असे सणसणीत प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.
पेपरफुटीमागे भारतीय जनता पक्षच
एकीकडे सुशासन असल्याचा दावा करताय आणि दुसरीकडे एका पिढीचे आयुष्य तुम्ही बरबाद केले आहे. फडणवीस त्याच्यावर काहीच बोलायला तयार नाहीत. त्यांनी एक पत्रकार परिषद तरी घ्यावी, पण ते काहीच करत नाहीत. याचा अर्थ या पेपरफुटीमागे भारतीय जनता पक्षच आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. आपआपल्या लोकांना पेपर आधी मिळावेत. त्यांनी चांगला स्कोअर करावा. यासाठी पेपर फोडण्याचे नेटवर्क भारतीय जनता पक्षानं, त्यातील प्रमुख लोकांनी तयार केलं. जशी न्याय व्यवस्था ताब्यात घेतली. निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली. त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपने ताब्यात घेतली आहे. या देशाचं वाटोळं केलं आहे आणि दुर्दैवाने त्याचा केंद्रबिंदु महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला जगात, देशात मान-सन्मान होता. या पेपरफुटीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी काय भूमिका घेतली? CBI कारवाई करते, पण राज्याचे गृहमंत्री आणि त्यांचे पोलीस खाते काहीच कारवाई करत नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
