ठाकरेंपाठोपाठ आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप… कोण फुटणार? बड्या नेत्याने थेट सांगितलं
UBT Shivsena - Congress Split: राज्यात विरोधी पक्षांना सुरूंग लावण्याचे सत्र थांबणार नसल्याच्या घडामोडी समोर येत आहे. ठाकरे सेनेनंतर शरद पवार राष्ट्रवादी पक्षच नाही तर काँग्रेसमध्ये पण येत्या काळात राजकीय भूकंप घडू शकतो असा दावा एका बड्या नेत्याने केला आहे.

Dharmraobaba Aatram claim Congress Split: राज्यातील विरोधी पक्ष खिळखिळे करण्याची मोहिम सुरू असल्याचे दिसते. राज्यात विरोधी पक्षांना सुरूंग लावण्याचे सत्र थांबणार नसल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. ठाकरे सेनेनंतर शरद पवार राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर त्यापाठोपाठ काँग्रेसमध्येही येत्या काळात राजकीय भूकंप घडण्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.
ठाकरे सेनेत मोठी फूट
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. 9 पैकी 6 खासदारांनी बंडाचा झेंडा बुलंद केला आहे. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र धाडले आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. तर विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सहा खासदारांचा हा गट शिंदे सेनेत विलीन होण्याची शक्यता आहे. पण हे ऑपरेशन मर्यादित नाही. 2029 च्या निवडणुकीपूर्वी आमदार आणि काही नगरसेवक फुटतील असा दावा करण्यात येत आहे. काळाच्या उदरात काय दडलंय हे आताच सांगता येणार नाही. शिंदे सेनेने तसे पत्तेही उलगडलेले नाही.
काँग्रेसमध्येही मोठी फूट?
राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस येत्या 12 डिसेंबरपर्यंत फुटू शकते आणि त्यांचे 5 खासदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात असा दावा केला आहे. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रीय पक्ष काँग्रेससुद्धा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे भाष्य केले आहे. काँग्रेसमधील किती खासदार अथवा आमदार फुटणार हा आकडा त्यांनी काही सांगितला नाही. पण राज्यात विरोधक औषधालाही सापडणार नाही असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. सर्वांना विकास हवा आहे आणि त्यासाठी हे इनकमिंग होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. काँग्रेसचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन राबवावे लागेल असे मोठे संकेत द्यायलाही आत्राम विसरेल नाहीत.
काँग्रेसची राज्यातील स्थिती?
2024 मधील लोकसभा आणि त्यानंतर झालेली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळवले. लोकसभेत राज्यातून काँग्रेसचे सर्वाधिक 14 खासदार आहेत. महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसबेत निवडून जातात. त्यात 14 खासदार काँग्रेसचे आहे. तर महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस पक्षाचे सध्या 16 आमदार आहेत. आता फुटीच्या चर्चा होत असल्या तरी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. काँग्रेसमधून कोणीही फुटणार नसल्याचा त्यांचा दावा आहे.
ऑपरेशन टायगरमध्ये 14 आमदार गळाला?
ऑपरेशन टायगर नंतर पुढचं ऑपरेशन खूप मोठं आहे.आता ऑपरेशन चौदा ,चौदा आमदार फुटण्याचे संकेत आमदार बांगर यांनी दिले आहेत. संजय राऊत पागल आहे. त्याच्या नादी लागू नये, तुमच्यात लय गुर्मी आहे तुम्ही लय बोलताय, इथून पुढे खासदार होऊन दाखवा, असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे.
