रेल्वेच्या कारभाराचा शेतकर्यांना फटका… हजारो एकर पिके पाण्याखाली, टीव्ही 9 मराठीने बातमी दाखवताच…
Akola Farmer Agitation: अकोल्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आशा अक्षरशः पाण्यात बुडाल्या. रेल्वे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या आयुष्यावरच बुलडोझर फिरवला. रेल्वेच्या गलथान कारभाराचा शेकडो नव्हे तर हजारो शेतकऱ्यांना फटका बसल. शेतातल्या पाण्यात बसून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

Akola Farmer Agitation Against Railway: रेल्वे विकासाच्या नावाखाली आयुष्यावरच बुलडोझर फिरवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि असंवेदनशील नियोजनाचा फटका अकोला जिल्ह्यातील शेकडो नव्हे तर हजारो शेतकर्यांना बसला आहे. अकोला-खंडवा रेल्वेमार्गासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, चित्तलवाडी, परसरामपूर आणि अडगाव परिसरातील हजारो एकर शेती अक्षरशः जलमय झाली आहे. 3 ते 5 फूट पाणी शेतात साचल्याने पेरणी केलेली पिके पाण्याखाली गेली. अनेक शेतकर्यांना अद्याप पेरणीही करता आलेली नाही. तर रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला.
रेल्वेचा गलथान कारभार, शेतकरी त्रस्त
अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा भराव टाकला. मात्र, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहासाठी पुरेशा नाल्या किंवा पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आली नाही.परिणामी पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये साचले आणि हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी या मागणीसाठी बाधित शेतकर्यांनी शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये बसून जलसमाधी आंदोलन केले.
शेतातच साचले तळे, पिके पाण्याखाली
काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र आता ही पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून कुजण्याची वेळ आली आहे. तर अनेक शेतांमध्ये इतके पाणी साचले आहे की, शेतकऱ्यांना अद्याप पेरणीही करता आलेली नाही. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. तर लाखो रुपयांचा खर्च करून केलेली पेरणी वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हतबल झाले आहेत.
एका बाजूला विकासाच्या नावाखाली रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे, तर दुसर्या बाजूला त्याच कामामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तर पाण्याचा तातडीने निचरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर रेल्वे प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट
टीव्ही 9 मराठीने याविषयीचे वृत्त दाखवले. त्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर रेल्वे प्रशासनाकडून शेतात साचलेलं पाणी काढायला सुरुवात झाली. जेसीबीद्वारे साचलेल्या पाण्याची वाट काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याप्रकरणी आभार मानले.
अकोल्यात रेल्वे प्रशासनाने Tv9च्या बातमीची दखल घेत जिल्ह्यातील हिवरखेडसह अन्य गावात जिथे हिरवागार शिवार दिसायला हवे होते, तिथे आज पाण्याचा अथांग साठा दिसत आहे. हजारो शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आशा अक्षरशः पाण्यात गेल्याची बातमी Tv9 ने दाखवताच अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली. अखेर रेल्वे प्रशासनाकडून शेतात साचलेलं पाणी काढायला सुरुवात झाली आहे. जेसीबीद्वारे शेतात साचलेल्या पाण्याचा वाट काढण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून होतोय. एकंदरीत रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा काढायला सुरुवात केली आहे. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला होता. रेल्वे प्रशासन जागा झाल्यानंतर आता नुसतं पाणी काढून चालणार नाही. शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
