IPL 2026, MI vs DC : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने, हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयी पताका कोणता संघ कायम ठेवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत आहे. दुसऱ्या टप्यातील सामने सुरू असून मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील 8वा सामना दिल्ली आणि मुंबई यांच्यात दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. हा सामना 4 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची प्रचंड उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये आहे. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला, तर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं आहे. त्यामुळे सलग दुसरा विजय कोण मिळवणार याची उत्सुकता असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या स्पर्धेत पहिल्यांदा भिडणार आहेत. मात्र यापूर्वीच्या अनेक पर्वात आमनासामना झाला आहे. चला जाणून घेऊयात या दोन्ही संघाचा रेकॉर्ड कसा आहे ते…
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत 37 सामने झाले आहेत. यात मुंबई इंडियन्सने 21, तर दिल्ली कॅपिटल्सने 16 सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या ही 257 आहे. तर मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सर्वाधिक धावसंख्या ही 247 आहे. यापूर्वी सर्वात कमी धावसंख्येची आकडेवारी पाहिली तर दिल्लीने मुंबईपुढे 66 धावांवर नांगी टाकली आहे. तर मुंबई सर्वात कमी स्कोअर हा 92 आहे.
कशी आहे अरूण जेटली मैदानातील खेळपट्टी?
अरूण जेटली मैदानातील खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक आहे. ही खेळपट्टी काळ्या मातीची आहे. त्यामुळे खूपच टणक आणि सपाट असते. इतकंच काय तर वेगवान आउटफील्ड आहे. त्यात मैदान छोटं असल्याने फलंदाजांना धावा करण्यात मदत होते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फार काही नाही. त्यामुळे विकेट घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण फिरकीपटूंना मदत होते.
नाणेफेकीचा कौल आणि निकाल
दिल्ली कॅपिटल्स हा संघ नाणेफेकीचा बाबतीत सर्वात लकी ठरला आहे. सर्वाधिक वेळा म्हणजेच 22 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या बाजूने 15 वेळा कौल लागला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने 5 वेळा बॅटिंग आणि 17 वेळा फिल्डिंग निवडली आहे. तर मुंबईने नाणेफेक जिंकल्यानंतर 7 वेळा बॅटिंग आणि 8 वेळा फिल्डिंग निवडली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने 7 सामने, मुंबईने 6 सामने जिंकले आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने प्रथम बॅटिंग घेतली तेव्हा 1 सामना जिंकला आहे. तर मुंबई इंडियन्स 3 सामन्यात विजयी ठरले आहेत. नाणेफेकीनंतर गोलंदाजी निवडल्यानंतर दिल्लीने 6 सामने, तर मुंबईने 3 सामने जिंकले आहेत.
