Team India Schedule: विराट कोहली आणि रोहित शर्माची विदेशात क्रेझ, बीसीसीआयकडे खास विनंती
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर आता क्रीडाप्रेमींना आयपीएल स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक असणार आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये मालिका खेळणार आहे. असं असताना विदेश दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी एक खास मागणी करण्यात आली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर आता टीम इंडिया तीन महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. या कालावधीत आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरूवात करेल. जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी आणि वनडे मालिका होणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. यावेळी तीन सामन्यांची वनडे मालिका असणार आहे. दुसरीकडे, इतर क्रिकेट बोर्डही भारताविरुद्ध मालिकांसाठी सज्ज आहेत. त्याला कारण फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा.. विराट कोहली आणि रोहित शर्माची जबरदस्त क्रेझ विदेशात आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त वनडे मालिका खेळण्याची विनंदी केली जात आहे. एका रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या आगामी विदेश दौऱ्याच्या हिशेबाने इतर क्रिकेट बोर्ड जास्तीत जास्त वनडे सामने खेळण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खेळताना पाहता येईल.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक असूनही श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि आयर्लंडसारख्या देशांनी बीसीसीआयशी संपर्क साधला आहे. यावेळी वनडे मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डही तयार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकात काही बदल करावे लागू शकतात. याचा परिणाम न्यूझीलंड दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे. कारण या दौऱ्यात तीन वनडे सामन्यांऐवजी 5 वनडे सामने खेळण्याचा विचार आहे. यामुळे टीम इंडियाचा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी सरावही होईल असं बोललं जात आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त वनडे सामने खेळतात. तसेच वनडे वर्ल्डकप 2027 नंतर निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया ज्या देशांचा दौरा करणार आहे. तिथे वनडे सामने अधिक खेळवण्याची मागणी होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहते अधिक संख्येने स्टेडियममध्ये येतील. त्यामुळे यजमान क्रिकेट बोर्डाचा फायदा होईल. आता वनडे सामन्यांचं वेळापत्रक कसं ठरवलं जातं, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
