Icc T20i World Cup 2026 : चॅम्पियन टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजयासह इतके सारे रेकॉर्ड्स, सूर्यासेनेचा जलवा, काय काय केलं?
Icc T20i World Cup 2026 : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 96 धावांच्या फरकाने विजय मिळवत टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाचा अंतिम सामन्यात धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. भारताने या विजयासह असंख्य विक्रम आपल्या नावावर केले.

बांगलादेशचा स्पर्धेवर बहिष्कार त्यानंतर पाकिस्तानचं टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय यामुळे आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाआधीच वादाला सुरुवात झाली. मात्र आयसीसीने हेकडी दाखवणार्या बांगलादेशला त्यांची जागा दाखवून दिली. आयसीसीने बहिष्काराची भाषा करणाऱ्या बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली. त्यानंतर काही बैठकींनंतर टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्ताननेही विरोधाची तलवार म्यान केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना महामुकाबला पाहायला मिळाला. टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाच्या चाहत्यांना अखेर या स्पर्धेचा शेवट जसा अपेक्षित होता तसाच झाला. टीम इंडियाने या 10 व्या पर्वात 9 पैकी 8 सामने जिंकत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तसेच सर्वाधिक तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत टी 20I वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वाची यशस्वी सांगता झाली. त्यानिमित्ताने या स्पर्धेत झालेल्या काही खास रेकॉर्ड्सहबाबत आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन
टीम इंडियाने रविवारी 8 मार्च रोजी अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिला तर एकूण तिसरा तर सलग दुसरा टी 20I वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने या विजयात योगदान दिलं. तसेच या स्पर्धेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान एकूण 20 संघांमध्ये 55 सामन्यांचा थरार रंगला. या निमित्ताने या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात झालेल्या काही खास विक्रमांबाबत आपण जाणून घेऊयात.
भारताचा सलग दुसरा आणि एकूण तिसरा वर्ल्ड कप
सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून पहिल्या स्पर्धेत भारताला टी 20I वर्ल्ड कप जिंकून देण्याची कामगिरी केली. सूर्या यासह भारताला टी 20I वर्ल्ड कप जिंकून देणारा एकूण तिसरा तर सलग दुसरा मुंबईकर कर्णधार ठरला. भारताला 2007 साली महेंद्रसिंह धोनी याने पहिलाच टी 20I वर्ल्ड कप जिंकून देण्याची कामगिरी केली. त्यानंतर रोहित शर्मा याने 2024 साली भारताला वर्ल्ड चॅम्पियन केलं. तर आता सूर्याने हा वारसा यशस्वीपणे सुरु ठेवला.
इंग्लंड-विंडीजला धोबीपछाड
टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी 20I वर्ल्ड कप उंचावत इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विंडीज आणि इंग्लंड या 2 संघांनी प्रत्येकी 2-2 वेळा टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती.
एका पर्वात सर्वाधिक षटकार
टी 20I स्पर्धेच्या 10 व्या पर्वात सर्वाधिक षटकारांची नोंद झाली. एकूण 20 संघांतील फलंदाजांनी या 10 व्या पर्वात 780 षटकार लगावले.टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या नवव्या पर्वात षटकारांचा आकडा हा 517 इतका होता.
टीम इंडिया सिक्सर किंग
भारत या 10 व्या पर्वात सर्वाधिक षटकार लगावणार संघ ठरला. टीम इंडियाकडून या पर्वात एकूण 106 षटकार लगावण्यात आले. इंडिया यासह वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात 100 पेक्षा अधिक षटकार लगावणारी पहिली टीम ठरली.
एका पर्वात 7 शतकं
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वात मोठा कारनामा झाला. यंदा एका पर्वात सर्वाधिक 2 शतकांचा विक्रम मोडीत निघाला. या 10 व्या पर्वात एकूण 7 फलंदाजांनी शतकं लगावली.
एका पर्वात सर्वाधिक षटकार
टीम इंडियाचा संजू सॅमसन एका पर्वात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला. संजूने सर्वाधिक 24 षटकार लगावले. तर गेल्या पर्वात सर्वाधिक 17 षटकारांचा विक्रम हा विंडीजच्या निकोलस पूरन याच्या नावावर होता.
एका पर्वात सर्वाधिक धावा
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान 10 व्या पर्वात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने याबाबतीत विराट कोहली याच्या 319 धावांचा विक्रम मोडीत काढला. साहिबजादाने या 10 व्या मोसमात सर्वाधिक 383 धावा केल्या.
संजू सॅमसन मॅन ऑफ टुर्नामेंट
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने फक्त 5 सामने खेळून मॅन ऑफ टुर्नामेंट होण्याचा बहुमान मिळवला. संजूने बाद फेरीतील शेवटच्या सामन्यांत अनुक्रमे 97, 89 आणि 89 अशा धावा केल्या. संजूने या पर्वातील एकूण 5 सामन्यांत 321 धावा केल्या. संजूला या कामगिरीसाठी मॅन ऑफ टुर्नांमेंट पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं.
एका पर्वात सर्वात वेगवान 20 अर्धशतकं
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात 25 पेक्षा कमी चेंडूत 20 अर्धशतकांची नोंद करण्यात आली. याआधी एकूण 9 पर्वात मिळून 27 अर्धशतकांची नोंद करण्यात आली होती.
14 वेळा 200 प्लस धावसंख्या
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात एकूण 14 वेळा 200 पार मजल मारली. त्याआधी 2007 साली 5 वेळा 200 पेक्षा अधिक धावांची नोंद करण्यात आली होती.
टीम इंडियाच्या 6 फलंदाजांचं ‘द्विशतक’
टीम इंडियाच्या 6 फलंदाजांनी 200 पेक्षा अधिक धावा केल्या. या 6 फलंदाजांमध्ये संजू सॅमसन. इशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. कोणत्याही संघाच्या 6 फलंदाजांनी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
अभिषेक शर्माची हॅट्रिक
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याची त्याच्या पहिल्याच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 3 वेळा आऊट होणारा पहिला फलंदाज (Test Playing Nation) ठरला.
बुम बुम बुमराह
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. बुमराह यासह या स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या अजंता मेंडीस याच्यानंतर 4 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.
जसप्रीत बुमराह याने सलग दुसऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम इकॉनमी रेटने मोहिमेची सांगता केली. तसेच बुमराह आणि वरुण चक्रवर्ती हे दोघे 10 व्या पर्वात संयुक्तरित्या सर्वाधिक 14 विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले.
