मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यामध्ये थैमान घातलंय. जोरदार पावसानंतर औरंगाबादमधील भिलदारी पाझर तलाव फुटलाय. जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे. तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण ही धरणं भरली असून जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली. चाळीसगावातील पीर मुसा कादरी दर्गा, शिवाजी घाट परिसरातील अनेक दुकाने वाहून गेली. तर सदर बाजार, देवळीवाडा आणि भीमनगर भागातील भिल्ल वस्तीत अनेक घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.