अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईवरून पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केवळ नावात खान असल्यामुळेच शाहरुख खानचा मुलगा आर्यनवर कारवाई केली जात आहे, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी लखीमपूर हिंसेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार लखीमपूर खीरी हिंसेकडे दुर्लक्ष करत आहे. लखीमपूरमध्ये काय चाललंय हे सरकारला दिसत नाही. एका 23 वर्षीय मुलाला सरकारी एजन्सी टार्गेट करत आहेत, असं सांगतानाच केवळ काही मतदारांना खूश करण्यासाठी भाजप मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला.
मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करून केंद्रावर टीका केली आहे. चार शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला अटक करण्याऐवजी तपास यंत्रणा एका 23 वर्षाच्या मुलाला त्रास देत आहे. कारण त्याचं आडनाव खान आहे. न्यायाची खिल्ली उडवून केवळ आपल्या मतदारांना खूश करणअयासाठी भाजप मुस्लिमांना टार्गेट करत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.