अहमदनगर : ठाकरे-केजरीवाल भेटीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले, तरी मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तुमच्याकडे एकनाथ असो किंवा दहानाथ असो आम्ही तुमचा पराभव करू असं म्हटलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याएवढे अंबादास दानवे मोठे नाही असं विधान केलं आहे. “आमचे मुख्यमंत्री देव आणि दानवही नाही. ते मानव आहेत.मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दानवेंना आमदार केलं ..एकनाथ शिदेंमुळेच आज तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. याची तरी जाणीव ठेवा.अंबादास दानवे अजून एकनाथ शिंदेंवर टीका करण्याएवढे मोठे झाले नाहीत”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.