Sanjay Raut Press | आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका, थेट राजीनाम्याचीच मागणी

| Updated on: Mar 18, 2026 | 11:19 AM

अहिल्यानगरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आता असं काही घडलेलं नाही असं देवेंद्र फडणवीस हे सांगतील.

अहिल्यानगरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आता असं काही घडलेलं नाही असं देवेंद्र फडणवीस हे सांगतील. “अशी घटना घडलीच नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. सरकार सक्षम असल्याचा दावा केला जाईल. गृहखातं सतर्क आहे आणि राज्यात महिला आणि मुली सुरक्षित आहेत, असं सांगितलं जाईल. विरोधक खोटा प्रचार करत आहेत, असेही म्हटले जाईल. इतकंच नव्हे, तर ज्या मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाला ती मुलगी नसून निर्जीव बाहुली आहे, अशी उत्तरेही विधानसभेत ऐकायला मिळू शकतात,” अशी खोचक आणि जळजळीत टीका राऊत यांनी केली. तसेच, “सत्ताधारी पक्षातील महिला नेत्यांना अशा घटना कधीच दिसत नाहीत. एका अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड फेकले जाते आणि अशा घटना वारंवार घडत असतील, तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरतात. त्यांनी गृहखात्याचा त्याग केला पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा बराच वेळ दिल्लीत जातो. त्यामुळे राज्यातील परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Mar 18, 2026 11:19 AM
Follow Us