Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून राज्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला आहे.
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून राज्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला आहे.
असम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून शिवसागर, डिब्रुगढ, जोरहाट, गोलाघाट, चराईदेव, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप आणि कार्बी आंगलाँगसह एकूण 16 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. या पूरामुळे राज्यातील 5.64 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत.
गेल्या 24 तासांत पूर आणि त्यासंबंधित दुर्घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 13 मृत्यू शिवसागर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबरोबरच बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू केले आहे.
पूरामुळे राज्यातील 872 गावं पाण्याखाली गेली असून हजारो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. अनेकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील रस्ते संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, पुराचा मोठा फटका शेतीलाही बसला आहे. 24 हजार हेक्टरहून अधिक शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असून भातासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून बाधित भागात मदतकार्य सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
