मुंबईः ऐन मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह विकोपाला गेला असून, याचे दर्शन गेल्या चार दिवसांपासून टीव्हीवर होत आहेच. आता याच वादाने पुढचे पाऊल टाकले असून, वांद्रे पश्चिमचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहून तक्रार केल्याचे समजते. त्यात भाई जगताप हे आपल्याला धर्मावरून बोलले, असा गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.