विधान परिषदेची पाचवी जागा जिंकण्यासाठी पूर्वयोजना झाली आहे. मी कंजूष असल्याने राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवलाय. तो विधान परिषदेला वापरणार, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. मतांची जमवाजमव करण्यासाठी भाजपची अपक्ष आमदारांसोबत चर्चा सुरू आहे. भाजप वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीही होत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाचवी जागा जिंकण्यासाठी सर्व योजना आखल्या आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.