Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण…. अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकार आणि CJP (कॉक्रोच जनता पार्टी) यांच्यात चर्चेची पहिली फेरी होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मोठा दावा करत, आज संध्याकाळपर्यंत स्वतःसह पक्षाच्या प्रमुख सदस्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकार आणि CJP (कॉक्रोच जनता पार्टी) यांच्यात चर्चेची पहिली फेरी होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मोठा दावा करत, आज संध्याकाळपर्यंत स्वतःसह पक्षाच्या प्रमुख सदस्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
अभिजीत दिपके यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत दुपारी चर्चा होणार असली तरी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर CJP ठाम आहे. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले.
माध्यमांशी बोलताना दिपके म्हणाले, “मला मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी किंवा रात्री मला आणि CJPच्या टीमला अटक केली जाऊ शकते. आम्ही गेल्या 35 दिवसांपासून जंतर-मंतरवर पूर्णपणे शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. आम्ही महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून संविधानाच्या चौकटीत आंदोलन करत आहोत. मग आम्हाला अटक का केली जाणार?” असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला.
यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले होते. त्याचप्रमाणे CJPच्या सदस्यांवर कारवाई केल्यास आंदोलन आणखी व्यापक स्वरूप धारण करेल, असा दावा त्यांनी केला.
तसेच, अटक झाल्यास आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले. “कायद्याचा आदर ठेवत आंदोलन सुरू ठेवा. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नका. देशाचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य टाळा,” असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले.
दरम्यान, सरकार आणि CJP यांच्यातील चर्चेतून कोणता तोडगा निघतो आणि दिपके यांनी व्यक्त केलेल्या अटकेच्या शक्यतेबाबत पुढे काय घडते, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
