Devendra Fadnavis : देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय? हिंदीच्या सक्तीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On New Education Policy : राज ठाकरेंनी नव्या शैक्षणिक धोरणतील हिंदीच्या सक्तीवर आक्रमक पवित्रा घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमात फक्त 2 भाषा ठेवण्याचा आग्रह राज ठाकरेंचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. केंद्राने 3 भाषांचं सूत्र ठरवलं आहे. शिवाय हिंदी भाषेसंदर्भातल्या नव्या जीआरमध्ये अनिवार्यता काढून टाकण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे. कुठलीही तिसरी भारतीय भाषा आता शाळेत शिकता येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
या बाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं की, मराठी ही कुठल्याही शाळेत अनिवार्यच असेल. हिंदीला मात्र पर्याय दिलेत. माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, केंद्र सरकारने विचारपूर्वक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आहे, तीन भाषांचं सूत्र आणलं आहे. जर देशभरात तीन भाषांचं सूत्र आहे, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी देशाकरता आहे. तीन भाषांच्या सूत्राविरोधात तामिळनाडू कोर्टात गेलं, पण कोर्टाने ते मान्य केली नाही. आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट, गैर काय आहे.
