जळगाव : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३४ तर शिंदे गट आणि भाजपचे १४ खासदार निवडून येतील असा अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटर सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत सरकारविरोधी चित्र दिसले. रोजगार उपलब्ध नाही, हजारो लोक बेरोजगार झाले, कर्जबाजारी झाले. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कापसाला भाव मिळण्यासाठी जे रस्त्यावर येत होते ते गिरीश महाजन आता कुठे आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे केली. फडणवीस यांचा बालेकिल्ला, गडकरी यांच्यासारखे राष्ट्रीय नेते, संघाचे बलस्थान असलेल्या नागपूरमध्ये भाजपने सपाटून मार खाल्ला. नागपूरची जागा मुद्दामहून या लोकांनी पाडली. ते म्हणजे शिक्षक लोकांनी. कारण त्यांना माहित आहे फडणवीस काही देणार नाही फक्त झुलवणार. त्यामुळे त्यांनी भाजपला पाडले. नागपूरचा एक वर्ग आहे ज्याला सुशिक्षित भाजप म्हटले जाते. पण, तोच मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देतो देशात चित्र बदलत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.