राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारच्या स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणती भूमिका पार पाडली याची सविस्तर माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, असे शरद पवार यांनी सांगितले. मात्र, याच वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. त्यांनी थेट महाभारताचा दाखला देत साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ! असं मिश्किल भाष्य केलं.
“द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले. कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा ? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
भाजपने शिवसेनेला जे वचन दिले होते त्याचे पालन केले नाही. त्यामुळेच शिवसेनेला वेगळा मार्ग शोधावा लागला, असा दावा शिवसेनेचे शीर्षस्थ नेते करत असतात. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावर यंदाच्या दसरा मेळाव्यात भाष्य केलं. भाजपने वचन पाळलं असतं तर मी राजकारणापासून दूर राहिलो असतो. मुख्यमंत्री झालो नसतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. हाच धागा पकडत शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कसे आले, याबद्दल सविस्तर सांगितलं.