Mahayuti : महायुतीत तिढा कायम, सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात; मूळ शिवसेना चिन्हावर किती पदाधिकारी निवडून आले? भाजपकडून थेट विचारणा

Mahayuti : महायुतीत तिढा कायम, सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात; मूळ शिवसेना चिन्हावर किती पदाधिकारी निवडून आले? भाजपकडून थेट विचारणा

Harshada Shinkar | Updated on: Dec 22, 2025 | 2:18 PM

पुण्यातील महायुती जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने ३५ जागांची मागणी केली असून, भाजपने मूळ शिवसेनेच्या चिन्हावर किती पदाधिकारी निवडून आले असा सवाल केला आहे. वरिष्ठांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने उदय सामंत पुण्यात आले आहेत.

पुण्यातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना नेते उदय सामंत आज पुण्यात दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जागावाटपावरून चर्चा अजूनही रेंगाळलेली आहे. वरिष्ठ स्तरावरील बैठकांमध्ये यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही, त्यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. शिवसेनेने पुण्यातील आगामी निवडणुकांसाठी ३५ जागांची मागणी केली आहे. मात्र, भाजप शिवसेनेला एवढ्या जागा देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

तर भाजपने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मूळ शिवसेनेच्या चिन्हावर किती पदाधिकारी निवडून आले आहेत? असा थेट सवाल विचारला आहे, ज्यामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, समाधानकारक जागा न मिळाल्यास पुण्यामध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा नारा दिला गेला आहे. उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर हा तिढा सुटतो की शिवसेना एकला चलो रे भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published on: Dec 22, 2025 2:18 PM
Follow Us