Sanjay Jadhav | पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका; संजय जाधव यांचा सरकारवर हल्लाबोल
परभणी जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महामार्गाचा कोणताही फायदा होणार नसल्याचा दावा करत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परभणी-गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटी येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सलग तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
परभणी जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महामार्गाचा कोणताही फायदा होणार नसल्याचा दावा करत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परभणी-गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटी येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सलग तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जमीन मोजणीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन अधिक तीव्र केले. या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाले. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनीही आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला. माध्यमांशी संवाद साधताना संजय जाधव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “शक्तिपीठ महामार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने घ्याव्यात, ही आमची भूमिका आहे. या जमिनी आमच्या उपजीविकेचे साधन आहेत. तरीही सरकार जबरदस्तीने जमिनी विकण्याचा दबाव टाकत आहे,” असे जाधव यांनी म्हटले.
जमीन मोजणीच्या नावाखाली अमानुष वर्तन झाल्याचा आरोप करत त्यांनी महिलांशी गैरवर्तन झाल्याचा मुद्दाही उपस्थित केला. “ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाज वाटावी अशी आहे,” असे ते म्हणाले. तसेच, भाजप सरकार केवळ स्वतःचे राजकीय हित साधत असल्याचा आरोप करत त्यांनी उद्योगपतींना पोसण्यासाठीच हे धोरण राबवले जात असल्याचे म्हटले. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हि एकमेव भूमिका ह्या भाजपची देशात चालू आहे असा आरोप जाधव यांनी भाजपवर केला आहे.
