मुंबई : नांदेडमधील वापरात असलेल्या वसतीगृहाचे उद्घाटन मा. राज्यपाल यांच्या हस्ते करून काय सिद्ध होणार? जुन्या इमारतीच्या उद्घाटनाचा अट्टहास का? असा सवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. विद्यापीठाने जुन्या इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करून राज्यपालांचा अवमान केला आहे. मा. राज्यपालांच्या प्रशासकीय यंत्रणेने ही माहिती घ्यायला हवी होती, असेही सामंत पुढे म्हणाले. मा. राज्यपालांच्या हस्ते नवीन इमारत, नवीन शैक्षणिक उपक्रम, विद्यापीठातील नवीन वसतिगृह, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम असे समारंभ करणे हा त्यांच्या पदाचा सन्मान ठेऊन घेणं अपेक्षित आहे. चार वर्षे वापरात असलेल्या इमारतीचे उद्घाटन नाही. राज्यपालांचा अपमान करण्या इतका मी मोठा नाही आहे. राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे आणि त्याची गरिमा आम्ही पाळतो, असे सामंत यांनी स्पष्ट केले.