Kalyan KC Gandhi School : हातात धागा अन् कपाळाला टिळा किंवा टिकली नको, कल्याणमधील शाळेचा अजब फतवा; पालकांचा संताप
कल्याणमधील कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिळा लावण्यास आणि हातात धागा बांधण्यास बंदी घातल्याचा फतवा जारी केला आहे. संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून, पालिकेने शाळेला नोटीस बजावली आहे.
कल्याण शहरातील कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिळा लावण्यास तसेच हातात धागा बांधण्यास बंदी घातल्याचा एक अजब फतवा जारी केला आहे. या शाळेच्या नियमानुसार, विद्यार्थिनींना डोक्याला टिकली लावण्यासही मनाई करण्यात आली आहे. शाळेच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षण विभागाकडे या संदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे.
पालकांच्या आरोपानुसार, काही विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळा शाळेतील कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने पुसून टाकला आहे. या प्रकाराबाबत पालकांनी जेव्हा मुख्याध्यापकांशी संपर्क साधला, तेव्हा मुख्याध्यापकांनी हे शाळेच्या नवीन नियमावलीचा भाग असल्याचे सांगितले. कोणताही विद्यार्थी कपाळाला टिळा किंवा डोक्याला टिकली लावू शकत नाही, असे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले.
या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण पालिकेने कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला नोटीस बजावली आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून, अशा प्रकारचे बंधन देशाच्या संस्कृतीवर घालणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. विभागाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
