महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेवर उच्च न्यायालयात जनहित याचिका; सुनावणीची तारीख ठरली, कोणावर कारवाईची मागणी?
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याच्यावर तातडीची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत केली होती.
नवी मुंबई : खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली आणि 14 लोकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याच्यावर तातडीची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मात्र तातडीच्या सुनावणीस नकार देत पुढील तारीख दिली आहे. आता याप्रकरणी आता 8 जूनला सुनावणी होणार आहे. यामुळे आता 8 जूनला याचिकेवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे. तर हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा होता. त्यासाठी 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय.
