Maharashtra Local Elections: अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत भाजप-शिंदे सेना आमने-सामने

| Updated on: Dec 31, 2025 | 11:53 AM

महाराष्ट्र महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची फक्त 11 महापालिकांमध्ये युती झाली आहे, तर 18 ठिकाणी ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मुंबई आणि ठाण्यात बहुपक्षीय लढत अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटल्याने दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापैकी 11 महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची युती झाली आहे. तर उर्वरित 18 महापालिकांमध्ये हे दोन्ही प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत, असे चित्र समोर आले आहे. ज्या महापालिकांमध्ये युती झाली आहे, त्यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी, वसई-विरार, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, इचलकरंजी आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. याउलट, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, मालेगाव आणि लातूरसह एकूण 18 महापालिकांमध्ये युतीचे सूत्र जमू शकले नाही.

विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटल्यानंतर शिंदे गटाच्या एका मंत्र्याने भाजपच्या भूमिकेवर अहंकारामुळे युती तुटल्याचा आरोप केला, तर भाजपनेही याला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये चार ते पाच पक्षांमध्ये लढत अपेक्षित असून, विविध पक्षांनी जागावाटपाचे आकडे जाहीर केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने, जिथे युती होऊ शकली नाही तिथे काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Dec 31, 2025 11:53 AM