Maharashtra LoP Row : नागपूर अधिवेशनातील विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदे सेनेतील 22 आमदार फुटणार?

| Updated on: Dec 09, 2025 | 11:10 AM

नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. ठाकरे गटाकडून पद मिळावे म्हणून आक्रमक भूमिका घेतली जात असताना, सत्ताधारी १० टक्के संख्याबळाचा नियम पुढे करत आहेत. भास्कर जाधव यांनी हा नियम नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आमदार फोडाफोडीचे दावे आणि ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नागपूरमध्ये सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेतेपदावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने या पदासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेत एक वर्ष उलटूनही विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती झालेली नाही, तर विधान परिषदेतील अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ते पदही रिक्त झाले आहे.

सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के संख्याबळाचा नियम पुढे केला जात आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ २८८ असून, त्यानुसार २९ आमदार एकाच विरोधी पक्षाचे असणे अपेक्षित आहे, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, भास्कर जाधव यांनी असा कोणताही नियम घटनेत किंवा कायद्यात नसून, विधिमंडळ सचिवांनी लेखी पत्राद्वारे हे स्पष्ट केल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे २०, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) १० आमदार आहेत.

दरम्यान, शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केले जात असल्याची चर्चा पेरण्याचा प्रयत्न झाला, तर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे २२ आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला. प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांच्या भेटीनंतर ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याच्या सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांना घ्यायचा आहे.

Published on: Dec 09, 2025 11:10 AM