Eknath Shinde : नाराजनाट्य कायम? शिंदेंना भाजपच्या सूचना, महायुतीचे वाद दिल्लीत नको तर राज्यात….
महाराष्ट्र भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मतभेद कायम आहेत. रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात शिंदे यांनी अमित शहांकडे तक्रार केली, तर भाजपने वाद राज्यातच मिटवण्याची सूचना केली.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतले अंतर्गत मतभेद अद्यापही मिटलेले नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नाराजीनाट्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिल्लीत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतील घटक पक्षांमधील वाद दिल्लीत आणण्याऐवजी ते महाराष्ट्रातच सोडवण्याची सूचना दिली असल्याची माहिती आहे.
या नाराजी नाट्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कल्याण-डोंबिवलीमध्ये घडलेली घटना. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिला होता, ज्यामुळे हे मतभेद अधिक तीव्र झाले. या प्रकारानंतर शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली होती. या भेटीनंतर तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांच्या पक्षांतील नेते, नगरसेवक किंवा माजी आमदारांना आपल्या पक्षात न घेण्याबाबत एक समझोता झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही रविंद्र चव्हाण यांनी इनकमिंग सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य केले होते, ज्यामुळे नाराजी पुन्हा वाढली.
