BJP Shiv Sena Conflict :  माझं महाराष्ट्रावर लक्ष.. महायुतीतील कुरघोड्या दिल्ली दरबारी पोहोचताच अमित शाह नेमकं काय म्हणाले?

BJP Shiv Sena Conflict : माझं महाराष्ट्रावर लक्ष.. महायुतीतील कुरघोड्या दिल्ली दरबारी पोहोचताच अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Harshada Shinkar | Updated on: Nov 21, 2025 | 11:28 AM

महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना नेत्यांना फोडल्याचा आरोप शिंदेंनी केला. "माझे महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष आहे," असे शहांनी शिंदेंना सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केल्याचे सूत्रांकडून समजते. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजपने ऑपरेशन लोटस राबवल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये नाराजी सुरू झाली होती. शिंदेंनी शहांकडे तक्रार करताना सांगितले की, रवींद्र चव्हाण कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी फोडण्याचे काम करत आहेत. हे काम महायुतीत वितुष्ट निर्माण करत असून आगामी निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील अशी भीती शिंदेंनी व्यक्त केली.

वैयक्तिक स्वार्थासाठी काही नेते काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले. महायुतीतली फोडाफोडी थांबवण्याची मागणी शिंदेंनी शहांकडे केली. यावर अमित शहांनी, “मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, माझं महाराष्ट्रातल्या घडामोडींवर लक्ष आहे,” असे सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

यानंतर, “मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नेता नाही, मी लढणारा नेता आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. केंद्रीय नेतृत्वाने भाजपला पक्षबांधणीचे काम सुरू ठेवण्यास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यास सांगितले आहे.

Published on: Nov 21, 2025 11:28 AM
Follow Us