Manoj Jarange Patil : उठा अन् मुंबईकडे चला, महाराष्ट्रासह सगळा देश बंद पडलाच… मनोज जरांगेंचं मराठ्यांना आवाहन काय?
मराठा आणि कुणबी हा जीआर आम्हाला मंजुरीसह पाहिजे. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असा निर्धार पक्का करत मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह येत्या २९ तारखेला मुंबईत धडकणार आहेत.
आजपासून कामं बंद आणि मुंबईकडे जाण्याची तयारी… असं मराठ्यांना सांगत मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करण्यास तयार झाले आहेत. येत्या २९ ऑगस्टला चलो मुंबई अशी हाक देत मुंबईतील मोर्चाची तयारी, नियोजन कसं असेल यांची माहिती मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेतून दिली.
‘माझ्या सोबत मुंबई येणाऱ्या एकही मराठा बांधवाने दगडफेक, जाळपोळ करायची नाही. तुम्हाला आरक्षण पाहिजे ना…दगड फेकून आरक्षण पाहिजे की शांततेने पाहिजे. न मिळणारं 70 वर्षांतलं आरक्षण दिलं नाही. मला समाजाचं नुकसान नाही करायचं वाटोळं नाही करायचं. मला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय…’, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं. पुढे ते असेही म्हणाले, महाराष्ट्रातील मराठ्यांना एक महत्त्वाचा शब्द सांगतो तोच तुम्ही ऐका फक्त… तो शब्द तुम्ही ऐकला की मराठे जिंकले.. तुम्ही उठा अन् मुंबईकडे चला, महाराष्ट्र नाहीतर सगळा देश बंद पडलाच म्हणून समजा…
