Manoj Jarange : निघालो आता मुंबईला… 26 तारखेपर्यंत आमच्या मागण्या… जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम तरी काय?
मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच 28 ऑगस्टला लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहेत. दरम्यन, या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या 26 तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा, असं जरांगेंनी म्हटलंय. पुढे जरांगेंनी असंही म्हटलं की, मुंबईला जाण्याचं नियोजन पूर्ण झालं आहे. तयारी अंतिम टप्यात आहे. 27 ऑगस्टला मुंबईत जाण्यावर ठाम आहे. आता मराठ्यांनो ही झोपण्याची वेळ नाही. एक घर एक गाडी करून सगळे मुंबईकडे निघणार असल्याचीही मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली.
