Manoj Jarange Mumbai Morcha : …तेव्हाच मुंबई सोडणार, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जरांगेंचा आझाद मैदानातून सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील यांना एकच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हा माझा शब्द आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर सकाळीच दाखल झाले. यानंतर आंदोलनस्थळाच्या व्यासपीठावरून त्यांनी आंदोलकांना संबोधित केला. काही सूचना दिल्या तर काही आवाहन देखील केलं. मनोज जरांगे म्हणाले, आपलं ठरलं होतं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण मुंबईतील आझाद मैदानावर जायचं..आपण मुंबईत आलोय. सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून आपण मराठ्यांनी मुंबई जाम करण्याचं ठरवलं होतं आणि तसं केलंय. सरकारने सहकार्य केलंय. आंदोलनाला एक दिवसाची परवानगी दिली. त्याबद्दल सरकारचे आभार… आता तुम्ही मुंबईकरांना, मुंबई पोलिसांना सहकार्य करा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं.
मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका, शांततेत रहा, गडबड गोंधळ करून नुकसान करून घेऊ नका, असंही सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. दरम्यान, आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही आणि मुंबई देखील सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा निर्धार देखील जरांगेंनी पुन्हा व्यक्त केला.
