Sanjay Raut Full Press | मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत संकेत दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “मुंबईत येऊन रोजगार करणाऱ्या चालकांनी मराठी शिकणं आवश्यक आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत संकेत दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “मुंबईत येऊन रोजगार करणाऱ्या चालकांनी मराठी शिकणं आवश्यक आहे. रिक्षात बसणारे बहुसंख्य प्रवासी मराठी असतात. भाषा न समजल्यामुळे गैरसमज, वाद आणि भांडणं होतात.”
ते पुढे म्हणाले, “मराठीच्या मुद्द्यावर सरकारला आव्हान देणे म्हणजे महाराष्ट्रालाच आव्हान देणे आहे. कोणत्याही सरकारने या प्रश्नावर मागे हटू नये.” तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या मराठी सक्तीच्या घोषणेचा उल्लेख करत त्यांनी, “त्या गर्जनेचं काय झालं?” असा सवाल उपस्थित केला. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकारने 1 मेपासून नियम लागू करून चालकांना सहा महिन्यांची मुदत द्यावी. “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा आहे, ती शिकणे अवघड नाही,” असेही ते म्हणाले. दरम्यान, सरकार मराठीच्या मुद्द्यावर मागे हटत असल्यास संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. “मराठीसाठी लढणं गरजेचं आहे,” असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या वक्तव्यामुळे मराठी सक्तीच्या मुद्द्यावर राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.