मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसंच या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल याने एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन वानखेडे यांच्यावर 25 कोटीच्या लाचखोरीचा आरोप करण्यात आला. त्यामुळे समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी एनसीबीची पाच सदस्यीय टीम मुंबई दाखल झाली आहे. त्यांनी आज समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवल्याची माहिती एनसीबीचे उप महानिदेशक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे. तसंच वानखेडे यांना या प्रकरणातील तपासापासून दूर केलं जाणार का? या प्रश्नावरही सिंह यांनी उत्तर दिलं आहे.
आज पाच सदस्यीय टीम मुंबईत पोहोचली. आम्ही इथल्या युनिटला विनंती केली होती की, जे मुख्य पंच आहेत प्रभाकर साईल आणि के. पी. गोसावी यांना नोटीस पाठवली जावी. त्यांनी मीडियात जे काही तथ्य सांगितले आहेत ते समितीपुढे मांडावे. पण आमच्या प्रयत्नानंतरही त्यांना नोटीस पाठवता आलेली नाही. मी मीडियाच्या माध्यमातून के पी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांनी आपली बाजू मांडावी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी तपासाला सहकार्य करावे. आमच्याकडे असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न झाला. एकाच्या घराला टाळा होता. तर दुसऱ्याचा पत्ता तपासला जातोय. त्यामुळे त्यांना नोटीस पोहोचली नाही. त्यांनी उद्या-परवा या दोन दिवसात वांद्र्यात सीआरपीएफ मेस येथे येऊन आपली बाजू मांडावी, असे आदेश सिंह यांनी गोसावी आणि साईल यांना दिले आहेत.