शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर उपनगरातील अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या हजारो गाड्या पाण्याखाली गेल्या. कांदिवली भागात ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्किंगमध्येही पावसाचं पाणी साचलं. अंडरग्राऊण्ड पार्किंगमध्ये 20 फुटांच्या वर पाणी साचल्यामुळे जवळपास 400 वाहनं बुडाल्याची माहिती आहे.
रात्री चार तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. अनेक जणांच्या घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर गाड्या अडकून पडल्या. ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बीएमसीच्या पे अँड पार्किंगमध्ये जवळपास 400 गाड्या (कार आणि रिक्षा) पार्क करण्यात आल्या आहेत. मात्र पार्किंगमध्ये 20 फुटांच्या वर पाणी साचल्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं.