अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले… रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
पंढरपूरमध्ये झालेल्या रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
पंढरपूरमध्ये झालेल्या रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी राष्ट्रवादीतील नेते मेहबुब शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट प्रतिक्रिया दिली आहे. ही फक्त स्टंटबाजी आहे’ असं ते म्हणाले.
माऊली हळणवर यांनी आंदोलकांवर गंभीर आरोप करत, ज्यांनी सरकारी कारखाने, बँका आणि दूध संघ डबघाईला आणले, अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले होते, असे म्हटले आहे. त्यामुळे आंदोलन झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा दावा करत संबंधित आंदोलकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पंढरपूरमध्ये राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
