Radhakrishna Vikhe Patil On Jarange । सावलीत बसा… अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, विखे पाटलांची जरांगेंना विनंती; पण जरांगे ठाम
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. रखरखत्या उन्हात शेतामध्ये बाज टाकून त्यांनी आंदोलन सुरू केले असून, यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर शासन स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. रखरखत्या उन्हात शेतामध्ये बाज टाकून त्यांनी आंदोलन सुरू केले असून, यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर शासन स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. केवळ आश्वासन नव्हे तर लेखी मसुद्यात नमूद केलेल्या बाबींवर शंभर टक्के कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि मनमानीमुळे काही प्रकरणे प्रलंबित राहिल्याचेही चर्चेदरम्यान स्पष्ट झाल्याचे विखे पाटील म्हणाले. अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाईबाबत सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, शासनाने तयार केलेला मसुदा जरांगे पाटील यांनी त्यांच्या अभ्यासकांशी चर्चा करून तपासावा, आवश्यक असल्यास सुधारणा सुचवाव्यात आणि तोपर्यंत उपोषण स्थगित करावे, अशी विनंती विखे पाटील यांनी केली. उन्हात बसण्याऐवजी सावलीत चर्चा करण्याचे आवाहन करत त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचीही चिंता व्यक्त केली.
शासनाला हा विषय प्रतिष्ठेचा बनवायचा नसून मराठा समाजाच्या हितासाठी सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
