स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांच्याऐवजी शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा संघटना संतप्त झाल्या आहेत. गादीचे वारस तुमच्याकडे आले होते. तुम्ही त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असं मराठा संघटनांनी म्हटलं आहे. तसेच छत्रपती घराण्यातील लोक निवडणुका लढवत नाहीत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती घराण्यातील कुणीच राजकीय पक्षात जात नाही हा दावा चुकीचा आहे, असं सांगत राऊत यांनी छत्रपती घराण्यातील लोक कोणत्या कोणत्या पक्षातून उभे राहिले होते याचे दाखलेच दिले. तसेच देशभरातील राजवंशातील लोक राजकीय पक्षात प्रवेश करून सामाजिक कार्य करत असतात, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं.