पुणे : पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपातीचे संकट पुणेकरांवर असणार आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा घसरला असल्याने पुणेकरांना पाणीकपातीचं संकट होतं. मात्र अशातच पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात पाणी कपातीची पुणेकरांवर टांगती तलवार होती मात्र पाणी कपात न करण्याचे आदेश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पुण्यात पाणी कपात करू नये, अशा सूचना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेला दिल्या आहेत. यासह ऐन उन्हाळ्यांच्या पार्श्वभूमीवर पाणी कपातीचे संकट असताना हा प्रश्न दूर करत पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुण्यातील नागरिकांना चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. यामध्ये 15 मे नंतर पाणी कपातीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते आणि आज या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.